4 जुलैपासून नागपुरात विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन
एबीपी माझा वेब टीम | 19 Jun 2018 06:12 PM (IST)
नागपूर इथे होणाऱ्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक मुंबईत झाली. या अधिवेशनात 4 जुलै ते 20 जुलै असं एकूण 13 दिवसांचं कामकाज होणार आहे.
मुंबई : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन 4 जुलै ते 20 जुलै या काळात नागपुरात पार पडणार आहे. नागपूर इथे होणाऱ्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक मुंबईत झाली. या अधिवेशनात 4 जुलै ते 20 जुलै असं एकूण 13 दिवसांचं कामकाज होणार आहे. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशच्या वेळी संमत न झालेले आणि नवीन असे एकूण 20 पेक्षा जास्त विधेयके या अधिवेशनात मांडली जातील, अशी माहिती बैठकीनंतर देण्यात आली. शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसाने झालेले नुकसान अशा विविध कारणांमुळे या अधिवेशनातही पुरवण्या मागण्या मांडल्या जाणार आहेत. दरम्यान, हिवाळी अधिवेशन हे मुंबईत घेतले जाणार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केलं. दरवर्षी पावसाळी अधिवेशन मुंबईत, तर हिवाळी अधिवेशन नागपुरात होतं, मात्र यंदा प्रथमच पावसाळी अधिवेशनही नागपुरात होणार आहे. पावसाळी अधिवेशनाची उत्सुकता कशामुळे? पावसाळी अधिवेशन पहिल्यांदाच नागपुरात होत आहे. त्यामुळे हा एक वेगळा अनुभव असेल. विधानसभेत आपल्या शैलीत सरकारची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ प्रसिद्ध आहेत. तुरुंगातून परत आल्यानंतर पहिल्यांदाच भुजबळ सभागृहात येतील. लातूर-बीड-उस्मानाबाद ही विधानपरिषदेची निवडणूक चांगलीच गाजली होती. भाजपचे विजयी उमेदवार सुरेश धस आता मोठ्या काळानंतर सभागृहात परतणार आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना आव्हान देण्यासाठी आता सुरेश धस सभागृहात असतील. शिवसेना आणि भाजप यांच्यातील संबंध पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत ताणले होते. त्यामुळे अधिवेशनात शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष असेल.