Legislative Assembly Session 2024: मुंबई: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Monsoon Sessions) शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात होत आहे. या आठवड्यात विधिमंडळात (Vidhimandal Adhiveshan) अनेक महत्त्वाची विधेयकं मंजूर केली जाणार आहेत. आज विधानपरिषदेत कामकाज सुरू झाल्यानंतर सर्वात आधी नवनिर्वाचित शिक्षक आणि पदवीधरमधून निवडून आलेल्या आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे. त्याचबरोबर मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकाच्या नामंतरणाबाबत करण्यात आलेल्या शासकीय ठरावही आज विधान परिषदेत ठेवला जाणार आहे. या ठरावात मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटीशकालीन नावं बदलण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. 


मध्य रेल्वे मार्गावरील कोणत्या स्थानकांची नावं बदलणार? 



  • करीरोड : लालबाग रेल्वे स्थानक

  • सॅन्डहर्स्ट रोड स्थानकाचं नाव बदलून डोंगरी रेल्वे स्थानक करण्याचा प्रस्ताव


पश्चिम मार्गावरील कोणत्या स्थानकांची नावं बदलणार? 



  • मरीन लाईन रेल्वे स्थानक : मुंबादेवी रेल्वे स्थानक

  • चर्नीरोड रेल्वे स्थानक : गिरगांव रेल्वे स्थानक


हार्बर मार्गावरील कोणत्या स्थानकांची नावं बदलणार? 



  • कॉटनग्रीन रेल्वे स्थानकाचं नाव : काळाचौकी रेल्वे स्थानक

  • डॉकयार्ड रेल्वे स्थानकाचे : माझगांव रेल्वे स्थानक

  • किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचे : तीर्थकर पार्श्वनाथ स्थानक


मुंबईत वीजेचे स्मार्ट मीटर लावण्यावरुन खडाजंगी


मुंबईत विधान परिषदेत आज स्मार्ट मीटरवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. मुंबईतील 70 टक्के घरगुती आणि 30 टक्के उद्योगधंद्यासाठी स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. मात्र, स्मार्ट मीटर लावल्याने ग्राहकांना पाच पटीनं जास्त वीज बिल येत असल्याचं निदर्शनास आलं आहे. याबाबत काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी विधान परिषदेत आज लक्षवेधी उपस्थित केली जाणार आहे.


विधानसभेचं आजचं कामकाज 


राज्यात मागील काही दिवसांपासून हिट अँड रनचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आज विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. यासोबतच विधानसभेत आज एकूण 10 लक्षवेधीवर चर्चा होणार आहे. यामध्ये भांडुप येथील सुषमा स्वराज रुग्णालयात प्रस्तुतीवेळी झालेले वीज खंडितचे प्रकरण लक्षवेधी द्यावं चर्चिले जाणार आहे. 


दरम्यान, अर्थशंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला सुरुवात होणार आहे. मागील दोन आठवड्यांत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करत त्यांना त्यांचाच योजनांविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशी अनेक महत्वाचे विषय दोन्ही सभागृहांमध्ये मांडले जाणार आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचे, दुष्काळाचे, कायदा सुव्यवस्था हे मुद्दे आहेतच. मात्र एक महत्वाचा मुद्दा दोन्ही सभागृहात मांडला जाणार आहे. विधानसभेत अर्थसंकल्प  पुरवणी मागणी यात आदिवासी, महसूल, ग्रामविकास या विषायवर चर्चा होणार आहे. सभागृहाच्या मंजुरीनं मुंबईतील 8 रेल्वे स्थानाकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव केंद्रात पाठवला जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर दोन्ही सभागृहात चर्चा पूर्ण झाली आहे.