लातूरमधील भाजप नगरसेवक सहलीवर, दगाफटका टाळण्यासाठी आयडिया
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर | 20 May 2017 12:19 PM (IST)
लातूर: लातूर महापालिकेच्या महापौरांची निवड येत्या 22 मे रोजी होणार आहे. मात्र काठावर बहुमत मिळालेल्या भाजपने खबरदारी म्हणून, आपल्या सर्व नगरसेवकांना सहलीवर पाठवलं आहे. लातूरमध्ये भाजपला पहिल्यांदाच बहुमत मिळालं आहे, पण सत्तेपर्यंत पोहोचताना त्यांच्या नाकी नऊ येत आहेत. महापालिकेच्या 70 पैकी 36 जागा जिंकत भाजप नंबर एकचा पक्ष बनला. तर काँग्रेसला 33 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाली होती. महापौर निवडीत कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी भाजपने आपले नगरसेवक सहलीवर पाठवले आहेत. आयात केलेले नगरसेवक ऐनवेळी दगा देतील याची धास्ती भाजपाच्या नेत्यांना आहे. कस्तुराई मंगल कार्यलयातून तीन वाहनांनी हे सर्व नगरसेवक बाहेरगावी रवाना झाले. प्रत्येक नगरसेवक आले की नाही याची कसून तपासणी झाली. ही सहल नाही तर प्रशिक्षणासाठी जात आहोत असे भाजपाच्या दोन स्थानिक नेत्यांनी सांगितले. एकजण मीरा भाईंदर, दुसरा लोणावळा तर तिसर्याने महाबळेश्वरला जात असल्याचं सांगितलं. काठावरचे बहुमत असल्याने दगाफटका झाल्यास हातात आलेली सत्ता जाण्याची भीती भाजपला आहे. कारण भाजपने मिळवलेल्या विजयातील बहुसंख्य नगरसेवक हे आयात केलेले आहेत. संबंधित बातम्या लातूर महापालिकेवर भाजपचा झेंडा