लातूर : लातूर केज, कळंब आणि अंबेजोगाई या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील पाणी वाढल्याने दुष्काळाचे सावट दूर झाले आहे. भर पावसाळ्यात लातूरकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. पावसाळा अखेरच्या टप्प्यात असतानाही पावसाने हुलकावणी दिल्याने लातूरकरांना पुन्हा रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागणार अशी स्थिती निर्माण झाली होती. गेल्या चार दिवसांमध्ये मांजरा धरणात  11 टीएमसी पाणीसाठा झाला असून सध्याही पाण्याची आवक सुरूच आहे. लातूरकरांसह अंबेजोगाई, कळंब, केज येथील नागरिकांना  परतीच्या पावसाने मोठा दिलासा दिला आहे.


लातूर शहराला सध्या 15 दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. शिवाय 1 नोव्हेंबरपासून 15 दिवसाला येणारे पाणी महिन्यातून एकदा येणार होते. तसे जिल्हा प्रशासनाकडून नियोजनही करण्यात आले होते. मात्र, परतीच्या पावसाने मोठा दिलासा दिला असून मार्च अखेरपर्यंत सध्याच्या प्रमाणे पाणीपुरवठा होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

1 ऑक्टोबर पासून एमआयडीसी भागातील पाणीपुरवठाही बंद करण्यात आला होता. मांजरा धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने दोन दिवसापासून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. 8 दिवसांपूर्वी मांजरा धरणात केवळ 4 टीएमसी पाणी होते. मात्र चार दिवसांमध्ये येथील चित्र बदलले असून धरणात सध्या 11 टीएमसी पाणी साठले आहे. अद्यापही धरणात पाणी साठत असून दोन दिवस पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. पावसाळा कोरडाठाक गेला असला तरी परतीच्या पावसाने लातूरकरांना दिलासा दिला आहे. पिण्याच्या पाण्यासह रब्बी हंगामासाठीही या परतीच्या पावसाचा मोठा आधार मिळणार आहे.