झेडपी निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी प्रचारतोफा थंडावणार
एबीपी माझा वेब टीम | 14 Feb 2017 07:42 AM (IST)
प्रातिनिधीक फोटो
मुंबई : 16 फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा परिषदांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. राज्यातील 15 जिल्हा परिषदांसह 165 पंचायत समित्यांसाठी 16 तारखेला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या मतदानामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. 15 जिल्हा परिषदांच्या 855 जागांसाठी 4278 उमेदवार रिंगणात आहेत, तर 165 पंचायत समित्यांच्या 1712 जागांसाठी 7693 उमेदवार जण नशिब आजमावतील. दुसऱ्या टप्प्यात दहा महापालिकांसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, गडचिरोली या जिल्हा परिषदांचा समावेश असून त्यासाठी 21 तारखेला मतदान होणार आहे. सर्व निवडणुकांचा निकाल 23 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे.