Santosh Deshmukh : पोलिस यंत्रणेवर आता आमचा विश्वास नाही, ॲट्रॉसिटीचा गुन्हा खून होण्याआधी दाखल केला असता तर हे झालं नसतं, त्यामुळे पोलीस हेच खरे गुन्हेगार आहेत, चांगल्या अधिकाऱ्यांना आम्ही चांगलेच म्हणत आहोत. मात्र, आरोपींसोबत ज्यांची हात मिळवणी केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आरोपी गुर्मीत असून आरोपींचे मनोबल वाढवले जात आहे, आम्ही समाधानी नाहीत, आरोपींना फाशी झाली पाहिजे ही आमची भूमिका असून आम्हाला इतर कोणत्याही गोष्टीबाबत देणं घेणं नाही, अशा शब्दात बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी भाजप आमदार सुरेश यांच्यासमोर आक्रोश व्यक्त केला. गावकऱ्यांनी 25 फेब्रुवारीपासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजप आमदार सुरेश धस मस्साजोगमध्ये पोहोचले. यावेळी गावकऱ्यांनी पोलिसी कारभाराची चिरफाड केली.
आम्ही सर्वजण अन्नत्याग आंदोलनावर ठाम आहोत, 25 तारखेला आंदोलन करणार आहोत. प्रशांत महाजन आणि राजेश पाटील हे दोन पोलिस सह आरोपी झालेच पाहिजेत. इथंच पुरावे कमकुवत झाले तर पुढे कसे होणार? न्यायालयीन चौकशीमध्येच याची चौकशी अशी गावकऱ्यांची मागणी असल्याचे देशमुख म्हणाले.
पोलीस यंत्रणेच्या चुकामुळे हा खून झाला
धनंजय देशमुख म्हणाले की, पहिल्या आठ दिवसांच्या तपासासंदर्भात सुरेश धस यांच्यासोबत चर्चा केली. आम्ही दिलेल्या मागण्या सुरेश धस मुख्यमंत्र्यांकडे द्याव्यात, पोलीस यंत्रणेच्या चुकामुळे हा खून झाला आहे. कृष्णा आंधळे फरार फक्त कागदोपत्री होता. मात्र, तो सर्रासपणे फिरत होता. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास पोलिसांसोबत सर्वकाही दिसून येत आहे. कृष्णा आंधळेवर यापूर्वी कारवाई केली नाही? सीआयडीकडे तपास दिल्यानंतर केज पोलिसांनी निष्क्रिय पद्धतीने काम केले. केज पोलिसांनी तपास यंत्रणाकडे पुरावे दिले नाही. हा प्रकार आरोपींना वाचवण्यासाठी झाला असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला.
प्रशांत महाजन हे 15 मिनिटात टोल नाक्यावर पोहोचले..
धनंजय देशमुख म्हणाले की, पोलिस अधिकारी प्रशांत महाजन हे 15 मिनिटात टोल नाक्यावर पोहचले. त्यांनी मुद्दामहून आम्हाला चुकीचे लोकेशन सांगितले. आरोपीला लोक मारतील म्हणून पोलिसांनी चुकीचे लोकेशन सांगितले. विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये वाल्मीक कराडला भेटायला राजेश पाटील का गेला होता? अशीही विचारणा गावकऱ्यांनी केली. प्रशांत महाजन हे केज पोलीस स्टेशन मध्ये का येतो? असाही सवाल गावकऱ्यांनी केला.
खालील पातळीहून रिपोर्टिंग चुकीचे जाते
केज पोलिसांनी कोणतेही पुरावे दिले नाहीत, नागरिकांनी सीसीटीव्ही पुरावे यंत्रणेला सादर केले. संवेदनशील केसमध्ये त्यांनी लक्ष दिले पाहिजे होते. आरोपींचे फोन कॉल पोलिसांना का गेले? कृष्णा आंधळे हा पहिला गुन्ह्यातील फरार आरोपी तरी देखील त्याला पोलिसांचे अभय आहे. खालील पातळीहून रिपोर्टिंग चुकीची जाते, असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या