कोल्हापूर : 'स्वाभिमानी शेतकरी संघटने'तून हकालपट्टी केल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वेगळी चूल मांडणार असल्याचं जाहीर केलं आहे. येत्या दसऱ्याला सदाभाऊ नव्या पक्षाबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.


शेतकऱ्यांसाठी नवी संघटना काढून आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. नव्या संघटनेचं नाव मात्र सदाभाऊंनी अद्याप ठरवलेलं नाही. राज्यभरातील शेतकऱ्यांची मतं जाणून संघटनेचं नाव ठरवलं जाणार आहे. नवीन संघटनेसाठी कार्यकर्त्यांनी नावं सुचवली असल्याचंही खोत म्हणाले.

सदाभाऊ खोत यांनी नाव न घेता राजू शेट्टींवरही जोरदार टीकास्त्र सोडलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करताना मला चक्रव्यूहात गोवल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

शेतकरी नेत्यांची जोडी फुटली, सदाभाऊंची ‘स्वाभिमानी’तून हकालपट्टी


'अनेक वार आम्ही झेलले. आम्ही नेतृत्व उभं केलं. परंतु नेतृत्वावर शिंतोडे उडू दिले नाहीत. आता भविष्यात आम्हाला कोणी अपमानित करु शकणार नाही. माझ्या कार्यकर्त्याला सन्मान मिळेल' अशा भावना सदाभाऊंनी व्यक्त केल्या. आपल्याला आत्मक्लेश झाला नसल्याचंही ते म्हणाले.

सदाभाऊंनी स्वाभिमानी संघटनेच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप करत गेल्याच आठवड्यात त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र स्वाभिमानीच्या कोट्यातलं मंत्रिपद अद्याप सदाभाऊंनी सोडलं नाही. त्यामुळे नवी संघटना स्थापन करण्यापूर्वी सदाभाऊ मंत्रिपद सोडतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.