खरं तर काळजात चर्र करणारी अशी ही घटना. मोहन चरेगावकर आणि त्यांचा मुलगा विनायक या दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली होती. जेव्हा याबद्दल समजलं तेव्हा कोल्हापूरच्या वळीवडे परिसरातील रहिवाशांनी चरेगावकरांच्या घराकडे धाव घेतली.
ज्या दिवशी मोहन यांची पत्नी वंदनानं या जगाचा निरोप घेतला, तोच दिवस चरेगावकर पिता-पुत्रांनी आत्महत्येसाठी निवडला. बरोबर एका वर्षापूर्वी मोहन यांची पत्नी वंदना यांचा मृत्यू झाला होता. पत्नी वंदनाच्या निधनामुळे मोहन आणि त्यांचा मुलगा विनायक पुरते खचले होते. वंदनाच्या रुपात त्यांचं जणू जगच हरवलं होतं.
सर्वांशी मिळून मिसळून वागण्याचा मोहन आणि विनायक यांचा स्वभाव. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वागण्यातला फरक मित्रांना स्पष्ट जाणवू लागला. मोहन यांना पत्नीशिवाय, तर विनायकला आईशिवाय जगणं जणू अशक्य झालं होतं. देवाघरी गेलेल्या वंदना यांना भेटण्याची ओढ त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती. अखेर मोहन आणि विनायक यांनी आत्महत्या करुन इहलोकीचा प्रवास सुरु केला.