किसान मोर्चाचं लाल वादळ मुंबईवर धडकणार नाही, महाजनांसोबत बैठकीत तोडगा
एबीपी माझा वेब टीम | 21 Feb 2019 11:08 PM (IST)
आदिवासी शेतकऱ्यांच्या वन हक्क जमिनीचे सर्व दावे तीन महिन्यात निकाली काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर नाशकातच हा किसान मोर्चा स्थगित करण्यात आला.
नाशिक : नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेलं लाल वादळ थांबवण्यात सरकारला यश आलं आहे. किसान सभेसोबत भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी घेतलेल्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाला. त्यानंतर किसान लाँग मार्च नाशिकमध्येच थांबवण्यात आला. गिरीश महाजन आंदोलकांच्या भेटीसाठी नाशिकला गेले होते. आदिवासी शेतकऱ्यांच्या वन हक्क जमिनीचे सर्व दावे तीन महिन्यात निकाली काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर नाशकातच हा मोर्चा स्थगित करण्यात आला. याशिवाय इतर सर्व मुद्यांवरही सहमती झाल्याची माहिती आहे. महाजनांची शिष्टाई सफल झाल्याने हे लाल वादळ मुंबईवर येऊन धडकलं नाही. दरम्यान, मोर्चा स्थगित करत आहोत, मात्र सरकारकडे याचा पाठपुरावा करत राहू, दर दोन महिन्यांनी बैठक घेऊ, अशी घोषणा किसान सभेतर्फे जे पी गावित यांनी केली.