Kirit Somaiya on Anil Deshmukh Arrest : 100 कोटींच्या वसुलींच्या आरोपानंतर ईडीच्या रडारवर असलेल्या अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना 13 तासांच्या चौकशीनंतर अखेर अटक करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांना अटक झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाटीवर टिकेचे बाण सोडले. वसूली झालेले 100 कोटी कोणाच्या खातात्यात कसे गेले? याची देखील माहिती लवकरच बाहेर येईल, असं वक्तव्य किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलं आहे. तर अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर आहे असंही ते म्हणाले आहेत. 


महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अखेर 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीनं अटक केली आहे. काल दुपारी बारा वाजताच्या दरम्यान अनिल देशमुख हे अखेर ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. यानंतर संध्याकाळी आठ वाजताच्या दरम्यान ईडीचे जॉईंट डायरेक्टर सत्यव्रत कुमार हे दिल्लीवरून थेट ईडी कार्यालयात दाखल झाले होते. त्यांनी देखील अनिल देशमुख यांची चार तास चौकशी केली आणि अखेर रात्री 1 वाजताच्या दरम्यान देशमुख यांना ईडीने अटक केली. याची माहिती रात्री सत्यव्रत कुमार यांनी दिली.


अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर रात्री 3 वाजेपर्यंत अनिल देशमुख हे त्यांचे वकील इंद्रपाल सिंग यांच्याशी चर्चा करत होते. रात्री 3 वाजताच्या दरम्यान वकील इंद्रपाल हे देखील ईडी कार्यालयामधून बाहेर पडले, तेव्हा त्यांनी आपण या अटकेला न्यायालयात विरोध करणार आहोत, अशी माहिती दिली. आज सकाळी 10 वाजता देशमुख यांना वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात येईल, तिथून ठीक 11 वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल. किमान सात दिवसांची तरी ईडी न्यायालयात देशमुख यांची कोठडी न्यायालयात मागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज ईडी आणि न्यायालयत येथे अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत. तर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या अटकेवर बोलताना अनिल देशमुख यांना अटक झाली असून पुढील नंबर हा अनिल परब यांचा असल्याचं म्हटलं आहे.


पाहा व्हिडीओ : कशी झाली अनिल देशमुख यांना अटक...?



वारंवार समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख गैरहजर


अनिल देशमुख यांना पाचवेळा तर त्यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना ईडीकडून वारंवार समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र सुरुवातीला अनिल देशमुख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जबाब नोंदवला जाण्याची मागणी ईडीकडे केली आणि त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं कारण देत पाचही वेळा ते ईडीसमोर आले नाहीत.


पाचही वेळा अनिल देशमुख यांनी आपल्या वकिलांमार्फत ईडीला पत्र पाठवून हजर होण्यासाठी मुदत मागितली होती. मात्र अनिल देशमुख कधीच ईडीपुढे चौकशीला हजर झाले नाही. त्यातच ईडीनं त्यांच्यावरील कारवाईचा धडाका सुरुच ठेवला आहे. अनिल देशमुख आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर छापे टाकले, तर अनिल देशमुख यांची साडेचार कोटींची संपत्ती जप्त केली. अनिल देशमुख असं म्हणाले होते की, कोर्टाचा निकाल आल्यानंतर ते ईडीसमोर हजर होतील. मात्र कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली, पण त्यांनतरही ते ईडीसमोर हजर झाले नाहीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Anil Deshmukh Arrested : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक