Maharashtra Heat Stroke Death:  खारघर दुर्घटनेबाबत महत्त्वाची बातमी आहे.  दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या 14 पैकी 12 जणांनी सहा ते सात तासांपासून काहीच खाललं नव्हतं, असं पोस्ट मॉर्टम अहवालात स्पष्ट झालं आहे. उर्वरित दोन जणांनी काही खाल्लं होतं की नाही ते स्पष्ट होऊ शकलेलं नाही. महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) वितरण सोहळा पार पडला आणि या सोहळ्यात उष्माघातामुळे 14 जणांना जीव गमवावा लागला. मृतांमध्ये दहा महिला आणि चार पुरुषांचा समावेश होता. या प्रकरणी सात रुग्ण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत.


 दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे यातील काहींना आधीपासून व्याधी होत्या. ज्यामुळे वेळेवर न खाणं आणि प्रचंड ऊन याची भर पडली, आणि त्यांचा मृत्यू झाला. उन्हात बसलेल्या लोकांना पाण्यानंही काही फरक पडला नसता, त्यांना सावलीचीच गरज होती, असं पोस्ट मॉर्टम करणाऱ्या एका डॉक्टरनं सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे पुरस्कार सोहळ्याच्या एक दिवस आधी पनवेल जिल्हा प्रशासनाचे अधिकारी पाहणीसाठी गेले होते. पाहणी करताना त्यांनाही उन्हाचा त्रास झाला. पण ही महत्त्वाची बाब त्यांनी वरिष्ठांना सांगितली नाही, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. 


तसेच एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर एबीपी माझाशी बोलताना माहिती दिली होती की, "श्री सदस्यांना सोबत येताना जेवण, पाण्याची बॉटल आणण्याच्या सूचना दिल्या होत्या". महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या श्रीसदस्यांना उष्माघाताचा फटका बसला आहे. दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेच्या दिवशी तापमान जवळपास 39 - 41 अंश सेल्सिअस होते. अशात शरीरातील पाणी कमी झालं, सोबतच रक्तातील प्रोटिन्सवर परिणाम देखील झाला. 


वातावरण तापलं; राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अॅक्शन मोडमध्ये


खारघरमधील घटनेनंतर उष्माघात किती भयावह असू शकतो हे दिसून आले. उन्हाळ्यात उष्माघातामुळे देशभरात होणारे हजारो मृत्यू टाळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने संपूर्ण देशासाठी एकसारखा हिट ऍक्शन प्लान तयार करण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी नागपुरातील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेला (VNIT) जबाबदारी सोपवली असून त्याचा अहवाल लवकरच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सोपवला जाणार आहे. याच अभ्यासात काही महत्त्वाचे प्रश्न समोर आले आहेत, ज्याचा विचार शहरांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने करण्याची गरज आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Heatstroke Deaths: आता दुपारी मोकळ्या जागेवर कार्यक्रम नाही; खारघर उष्माघात दुर्घटनेनंतर सरकारला जाग