Kashedi Bogda Accident : कल्याण : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग पाहायला मिळत आहे. अशातच कशेडी घाटात गावाकडे कोकणात निघालेल्या दोन बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 80 प्रवासी होती. पण सुदैवानं कोणतीही जीवीतहानी झालेली नसून सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती मिळत आहेत. 


गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या दोन बस कंटेनरवर धडकल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. पण, ते म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी... दैव बलवत्त म्हणूनच 80 प्रवासी सुखरूप बचावले आहेत. कशेडी बोगद्यात बाईकला वाचवण्यासाठी कंटेनरनं अचानक ब्रेक मारला, त्यामुळे मागून येणाऱ्या प्रवाशांनी फुल्ल भरलेल्या दोन बस एकमेकांवर आदळल्या आणि भीषण अपघात झाला. सुदैवानं बसमधील 80 प्रवासी सुखरुप बचावले आहेत. तसेच, बाजूनं जाणारा दुचाकीस्वारही थोडक्यात बचावला आहे. अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून रवाना करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


गणेशोत्सव सणाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेले आहे. मुंबईकर चाकरमानी लाखोंच्या संख्येनं कोकणाकडे येण्यासाठी निघाले आहेत. मात्र, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव ते लोनेरे या दहा किलोमीटरच्या परिसरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. मुंबईकर चाकरमान्यांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्गावर रखडलेल्या कामाच्या ठिकाणी ही वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. अशातच आता अपघातामुळे वाहतूक कोंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. 


गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणाकडे, मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी


अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. आजपासून मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुसळधार पाऊस आणि खड्ड्यांचा सामना करत मुंबईकर कोकणात दाखल व्हायला सुरवात झाली आहे. पण, त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहानांची प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.