औरंगाबाद :नामविस्तार दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गेटवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र रामदास आठवलेंचं भाषण सुरु होताच कार्यकर्त्यांनी भाषणाला विरोध केला. आठवले भाषणाला उठताच कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.


या अभूतपूर्व गोंधळामुळे आठवले यांना आपलं भाषण केवळ सहा ते सात मिनिटात आवरावं लागलं. कार्यकर्त्यांनी आठवले यांच्या भाषणालाच विरोध केला. कार्यकर्त्यांनी सभेच्या ठिकाणी घोषणाबाजी करत सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला.

कोरेगाव- भीमा घटनेची किनार या आजच्या सभेतील गोंधळाला होती, असं बोललं जात आहे. नामविस्तार दिनाच्या‘एक विचार एक मंच’ला आठवले गटाने फारकत घेतली.

तणावपूर्ण वातावरणात रामदास आठवले यांनी अवघ्या सात मिनिटात आपलं भाषण आटोपतं घेतलं. ऐक्य होणार होणार असेल तर माझा गट बरखास्त करण्याची माझी तयारी आहे. मात्र,केवळ एक दिवस स्टेजवर जाण्याचं नाटक मी करणार नाही, असं आठवले म्हणाले.