Kamgar Din Labour Day : कामगार दिनीच मुंबईच्या आझाद मैदानावर कामगारांचा मोर्चा धडकणार आहे. यासाठी पुणे-मुंबई दुचाकी रॅली ही काढली जाणार आहे. जाचक कामगार कायदे रद्द करावेत या मागणीसाठी ही रॅली काढली जात आहे. कामगार नगरी समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमधून या रॅलीला निघेल. रविवारी सकाळी सहा वाजता ही रॅली निघेल. कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष कैलास कदमांनी अशी माहिती दिली. त्यामुळे आम्ही कामगार दिन साजरा न करता, केंद्र सरकारचा याद्वारे निषेध व्यक्त करण्यात येईल.


कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी सांगितलं आहे की, प्रचलित कामगार कायदे रद्द करून केंद्र सरकारने चार नवीन कायदे करून देशभरातील सर्व संघटित, असंघटित कामगारांची सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक सुरक्षितता धोक्यात आणली आहे त्याचा निषेध सर्व कामगार संघटनांनी रस्त्यावर उतरून विरोध केला आहे. हे कामगार कायदे रद्द करावेत आणि पूर्वीचेच कामगार कायदे लागू करावेत या मागणीसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व कामगार संघटना रविवार दिनांक 1 मे रोजी पुणे मुंबई दुचाकी रॅली काढून निषेध करणार आहेत.


पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथून या रॅलीस रविवारी सकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे. दुपारी तीन वाजता मुंबईतील आझाद मैदान येथे या रॅलीचे सभेत रूपांतर होईल. यानंतर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना भेटून निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती  डॉ. कैलास कदम यांनी दिली आहे. यावेळी ज्येष्ठ नेते मानव कांबळे, कामगार नेते अनिल रोहम, वसंत पवार आदी उपस्थित होते.


यावेळी डॉ. कैलास कदम यांनी सांगितले की, पिंपरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि महात्मा फुले पुतळा तसेच महात्मा गांधी आणि कामगार संघटनांचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण कतून या रॅलीची सुरुवात होईल. या रॅलीमध्ये पिंपरी चिंचवड सह पुणे जिल्ह्यातील सर्व भागातील कामगार संघटना आणि रायगड, ठाणे, नवी मुंबई व मुंबईतील कामगार कामगार संघटनांचे प्रतिनिधी  सहभागी होतील. पिंपरीतून किमान एक हजार दुचाकी रॅली मुंबईकडे निघतील. आझाद मैदान पर्यंत  त्यांची संख्या पाच हजार पेक्षा जास्त होईल. देशभरातील कोणत्याही कामगार संघटनांची मागणी नसताना कोरोना काळात देशभर सर्व उद्योग व्यवसाय ठप्प अससताना केंद्रातील भाजप सरकारने विरोधी पक्षांना किंवा कोणत्याही कामगार संघटनांना विश्वासात न घेता हुकूमशाही पद्धतीने नवीन कामगार कायदे संसदेमध्ये संमत केले. हा देशातील कष्टकरी कामगारांचा विश्वासघात आहे या नवीन कामगार कायद्यांमुळे कायम कामगार ही संज्ञा नष्ट होणार असून भविष्यात सर्व पिढ्यांचे आर्थिक, सामाजिक स्थैर्य यामुळे संपुष्टात येणार आहे. पूर्वीचे कामगार कायदे लागू करावेत यासाठी आणि कामगारांना सामाजिक, आर्थिक, सुरक्षितता मिळावी या मागणीसाठी रविवारी होणाऱ्या या पुणे - मुंबई दुचाकी रॅलीमध्ये सर्व संघटित व असंघटित कामगारांनी सहभाग घेऊन केंद्र सरकारचा निषेध करावा असे आवाहन कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी या वेळी केले.