Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी खोचक टोला लगावला आहे. तपासे यांनी बोलताना शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड केले. हे आमदार कुठल्या पक्षात जातील याबाबत उत्सुकता आहे. ते आमदार भाजपमध्ये जातील असे बोलले जात होते. ते भाजपमध्ये जाण्यास तयार नाही. ते प्रहारमध्ये जातील, तशीही परिस्थिती नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे 40 आमदार कुठल्या गटाचे आणि पक्षाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाच्या निकालानंतर सरकार किती वैध किती अवैध आहे हे स्पष्ट होणार आहे. ४० आमदारांचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हा प्रश्न घेवून राज ठाकरेंकडे गेले का, असा प्रश्न निर्माण होतोय. मनसे प्रमुख राज ठाकरे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. या भेटीपश्चात ज्या पक्षाकडे एक आमदार आहे, तो पक्ष एका रात्रीत 40 आमदारांचा मालक होईल का? अशी उलट सुलट चर्चा आहे असे प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे. पुढे बोलताना ठाकरे आणि फडवणीसमध्ये नेमकी काय चर्चा झाली ही माहिती समोर आलेली नसल्याने बंडखोर गट मनसेत जाणार का ही चर्चा सध्या असल्याचे त्यांनी सांगितले.


केसरकरांनी थोडं तारतम्य बाळगलं असतं तर आनंद झाला असता - महेश तपासे
एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शरद यांच्यावर टीका केली होती. याबाबत बोलताना महेश तपासे यांनी दीपक केसरकरांचं शरद पवार यांच्याबाबत  वक्तव्य चुकीचे होते, शरद पवार हे माणसं जोडणारे नेते आहेत तोडणारे नाहीत. केसरकर यांच्याकडे अनधिकृत सरकारच्या प्रवक्ते पदाची  जबाबदारी आहे. त्याच्यामुळे त्यांनी बोलताना थोड तारतम्य पाळलं असतं तर आनंद झाला असता. शरद पवार यांच्याबाबत वक्तव्य करत असताना आपण ही त्या पक्षाचे नेते होतो, लोकप्रतिनिधी होतो, मंत्री होतो याचा विसर त्यांना पडला असावा असा टोला केसरकर यांना लगावला. 


आम्ही काही तरी करतोय हे दाखवण्याची  धडपड -  
ठाकरे सरकारने औरंगाबाद, उस्मानाबाद किंवा नवी मुंबई विमानतळाचा नामांतरनाचे निर्णय शिंदे सरकारने स्थगित केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार अल्पमतात असताना कॅबिनेट मध्ये घेतलेले निर्णय बेकायदेशीर असतात, त्यामुळे उद्या कॅबिनेट मध्ये हे नामांतरनाच्या निर्णयावर शिक्कमोर्तब करू असे स्पष्ट केलं. याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. महविकास आघडी सरकारने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद, उस्मानाबाद किंवा नवी मुंबई विमानतळाचा नामांतरनाचा विषय कॅबिनेटमध्ये मंजूर झाला. तिन्ही पक्षांनी त्याला स्वीकृती दाखवली, महाराष्ट्राने त्या निर्णयच स्वागत केलं, आता आम्ही काही तरी करतोय हे दाखवण्याची जी धडपड मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांची आहे. त्यातून त्यांनी सगळे जुने निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला,   घेतलेले निर्णय आम्ही घेतले हे दाखवण्याचा त्यांचा एक प्रयत्न असू शकेल म्हणून कदाचित  त्यांनी मागचे निर्णय रद्द केले असतील, अशी टीका महेश तपासे यांनी केली.