मुंबई : जामिया विद्यापीठातील हिंसाचार जालियनवाला बाग हिंसाचाराची आठवण करून देणारा आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. देशातील तरूणांना बिथरवू नका, असा इशाराही त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील जामिया विद्यापीठातील हिंसाचारावर पहिल्यांदाच भाष्य केले आहे.


उद्धव ठाकरे म्हणाले, देशात अशांतता आणि अस्वस्थततेचं वातावरण निर्माण केलं जात आहे. मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरत आहे. दिल्लीत विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला. जणू काही जालियनवाला बागेतले दिवस परत आले की काय? जालियनवाला बाग झाला तेव्हा ज्याप्रमाणे हिंसाचार घडला होता, तसंच वातावरण देशात पुन्हा निर्माण केलं जात आहे की काय? अशी भीती देशात आणि तरुणांच्या मनात आहे.

'ज्या देशात तरुण बिथरतो तो देश स्थिर राहू शकत नाही. म्हणून मी केंद्र सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही तरुणांना बिथरवू नका. ते भावी आधारस्तंभ आहेत. तरुण आपली शक्ती आहेत. हा तरुण बॉम्ब आहे, त्याची वात पेटवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने करु नये', अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना दिलेला शब्द मी पाळणारच. शेतकऱ्य़ांच्या मुद्द्यावर विरोधकांनी उगाचच गोंगाट करु नये," अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. विरोधकांच्या गदारोळानंतर हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विधानसभेचं कामकाज तहकूब झालं. त्यामुळे काल एक तास आणि आज एक तास... असं दोन दिवसात केवळ दोन तासच काम झालं.

Jamia Protest Reax | जामियातील हिंसाचार जालीयनवाला बागेची आठवण करून देणारा : उद्धव ठाकरे | ABP Majha



अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजाराची मदत दिली जात नाही, तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. यावरुन आज सभागृहात जोरदार गोंधळ झाला. यानंतर सभागृहाचं कामकाज तहकूब झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर हल्ला चढवला. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचा शब्द देऊन आम्ही सत्तेवर आलो आहे, मी दिलेला शब्द पाळणार असं उद्धव ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या
शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळणारच, विरोधकांनी उगाचच ओरडू नये : मुख्यमंत्री