'दानवेंच्या घसरणाऱ्या जिभेचा शेंडा कापा, 5 लाख मिळवा'
एबीपी माझा वेब टीम | 12 May 2017 03:21 PM (IST)
जालना : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जिभेचा शेंडा कापून आणणाऱ्याला 5 लाख रुपयाचं बक्षीस देणार असल्याची ऑफर शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना हिणवणाऱ्या वक्तव्यानंतर दिलगिरी व्यक्त करुनही रावसाहेब दानवेंविषयीचा रोष कमी झालेला दिसत नाही. जालन्यात शेतकरी संघटनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आलं आहे. या निवेदनात दानवे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. बेताल वक्तव्य करुन शेतकऱ्यांना हिणवणाऱ्या दानवेंच्या जिभेचा तुकडा तोडून आणून देणाऱ्यास 5 लाखांची रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे बक्षीसाची रक्कम भीक मागून जमा करण्यात येईल, असंही या निवेदनात म्हटलं आहे. दानवे यांच्या 'त्या' विधानाचा अर्थ त्यांनी स्वतःची मालमत्ता विकुन शेतकऱ्याची तुर खरेदी केली असा होत असल्याचा दावा शेतकरी संघटनेने केला आहे. दानवेंवर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा मुख्यमंत्र्यांचा आगामी काळातील दौरा जालना जिल्ह्यात होऊ देणार नाही, असा इशाराही शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनावर शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय कदम यांच्यासह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मी कार्यकर्त्यांबद्दल अपशब्द वापरला, शेतकऱ्यांबद्दल नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. शेतकऱ्यांची मनं दुखावली असतील तर दिलगिरी करतो असं म्हणत त्यांनी सशर्त माफी मागितली. त्यामुळे झालेल्या चुकीबद्दल दानवे माफी मागत आहेत, की उपकार करत आहेत, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
जालन्यामध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं होतं. कापसाला, तुरीला, डाळीला भाव नाही असली गाणी बंद करा, असं दानवे म्हणाले आहेत. एवढंच नाही तर यावेळी दानवेंनी असंसदीय भाषेचा वापरही केला. काय आहे वक्तव्य? राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली, तरी रडतात XXX, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं. कापसाला, तुरीला, डाळीला भाव नाही असली गाणी बंद करा, अशी मुक्ताफळं दानवेंनी उधळली. याशिवाय दानवे यांनी असंसदीय भाषेचा वापरही केला होता.
व्हिडीओ :दानवेंची वादग्रस्त वक्तव्य :हजार-पाचशेच्या नोटा असतील तर द्या, मी बदलून देतो : दानवे “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी केल्यानंतर सर्वाना धक्का बसला. मात्र, तुमच्याकडे नोटा असतील तर द्या माझ्याकडे, मी बदलून देतो आणि आपल्याजवळ कुठे नोटा बंद आहेत?”, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी चिखलीतील सभेत केलं. “दुष्काळ नव्हता, तरी ओरडून सांगितलं म्हणून मदत मिळाली” “गेल्या वर्षी अख्ख्या मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळ नव्हता, मात्र आम्ही मुद्दाम फाडून सांगायचो की, खूप दुष्काळ आहे. माणसं स्थलांतर करत आहेत, जनावरं मरत आहेत आणि हे खोटे चित्र उभे आम्ही करत होतो. याचा परिणाम असा झाला की 68 वर्षांत पहिल्यांदा 4200 कोटींची मदत मिळाली.”, असं धक्कादायक वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केलं होतं. "… त्या लक्ष्मीचा स्वीकार करा" पैठणमधील प्रचारसभेत बोलताना रावसाहेब दानवेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण त्या रात्री घरात लक्ष्मी येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा.”, असं वादग्रस्त वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. कर्जमाफीनंतर आत्महत्या थांबतील हे लेखी द्या : दानवे कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या थांबणार असतील, तर विरोधकांनी एकत्र यावं आणि त्यांनी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असा लेखी प्रस्ताव द्यावा, असं अजब वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. ते आज शिर्डीत बोलत होते.