जालना : बारावीच्या परीक्षेला जाताना दोघा चुलतभावंडांचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे जालन्यातील घुनावत कुटुंबावर शोककळा पसरली आहे.


ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन अनिल आणि सुनिल घुनावत या चुलत भावंडांचा मृत्यू झाला. तर त्यांचा मित्र करण सुंदर्डे गंभीर जखमी झाला. त्याच्यावर औरंगाबादमध्ये उपचार सुरु आहेत. बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपरला जाताना जालना-भोकरदन रस्त्यावरील कुंभारी फाट्याजवळ हा अपघात घडला.

जालना जिल्ह्यातील तडेगाववाडी गावात घुनावत कुटुंब राहतं. सुनिल घुनावत हा पदवीचं शिक्षण घेत होता, मात्र चुलतभावाची बारावीची परीक्षा असल्यामुळे त्याला भोकरदनमधील रामेश्वर महाविद्यालयात सोडण्यासाठी तो जात होता. कुंभारी फाट्यावर ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन सुनीलचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर अनिल घुनावत आणि करण सुंदर्डे या दोघांना उपचारासाठी भोकरदन येथील शासकीय दवाखान्यात नेण्यात आलं. पण दोघं गंभीर असल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी औरंगाबादला हलवण्यात आलं. मात्र औरंगाबादमधील डॉक्टरांनी अनिल घुनावतलाही मृत घोषित केलं.

या घटनेमुळे तडेगाववाडी गाव आणि महाविद्यालयावर शोककळा पसरली आहे. दुचाकीला धडक देणाऱ्या ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.