जळगाव: राज्यभरातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलनं केल्यानंतर सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली. मात्र त्याचा लाभ घेण्यात शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे.


त्यातही जे शेतकरी कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत, भावकीचा वाद किंवा अन्य कारणांमुळे जेलमध्ये आहेत, त्यांना कर्जमाफीचा अर्ज कसा भरायचा हा मोठा प्रश्न होता. मात्र या प्रश्नावरही सरकारनं उत्तर शोधलं.

अशा शेतकऱ्यांसाठी कारागृहातच कर्जमाफीचा अर्ज भरून घेण्याची व्यवस्था करण्यात आली.

जळगावच्या कारागृहातील शेतकऱ्यांना इथल्या अधिकाऱ्यांनी याबाबत मोठी मदत केली. कारागृहातच कर्जमाफीचा अर्ज भरण्याची सोय केल्यामुळे, इथले शेतकरीही समाधानी आहेत.

कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी या शेतकऱ्यांना स्वतः हजर राहणं गरजेचं होतं. त्यामुळे ही व्यवस्था करण्यात आली. या निर्णयामुळे या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना कर्जमाफीच्या निर्णयाचा फायदा घेता येणार आहे. 

कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी कैद्यांना कारागृहाबाहेर जाणे आवश्यक ठरणार होते. शिवाय शेतकऱ्याचे कुटुंबदेखील त्यासाठी आवश्यक असल्याने,  कारागृहातील बंदी शेतकरी आणि त्यांच्या परिवारपुढे कर्ज माफीच्या योजनेचा लाभ घेण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती.

मात्र राज्य सरकारने थेट जेलमध्येच ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिल्याने हा प्रश्न मिटला.