नागपूर : आशियातील सर्वात मोठा वाघ 'जय' बेपत्ता झाल्यानंतर त्याचे तीन बछडेही गायब झाल्याचं समोर आलं आहे. जयला चार बछडे होते, त्यापैकी तीन बछडे गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता आहेत. मात्र त्यांना शोधण्यासाठी वन विभागाने आतापर्यंत कसलेही प्रयत्न केले नसल्याची सूत्रांची माहिती आहे.


 

बछड्यांची जंगली कुत्र्यांकडून शिकार?

 

जयच्या या बेपत्ता बछड्यांची जंगली कुत्र्यांनी शिकार केली असल्याची शक्यता आहे. बछडे गायब झाल्यानंतर वन विभागाकडून कसलीही शोधमोहिम हाती घेण्यात आली नाही. मात्र ही माहिती जेव्हा समोर आली, तेव्हा वन विभागाने हालचाली सुरु केल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली. चांदी वाघिणीचे हे 5 महिन्यांचे बछडे आहेत. जय गेल्यानंतर त्यांचं रक्षण करण्यासाठी कोणीही नसल्याने शिकार केली असल्याची शक्यता आहे.

 

जय 18 एप्रिलपासून बेपत्ता

 

नागपूरच्या उमरेड अभयारण्याची ओळख बनलेला जय हा तरणाबांड वाघ 18 एप्रिलपासून बेपत्ता आहे. त्याला शोधण्यासाठी 100 हून अधिक स्वयंसेवकांनी मोहीम राबवली आहे. आशियातील सर्वात मोठा वाघ अशी जयची ओळख आहे. तब्बल 250 किलो वजन असलेला हा तरणाबांड वाघ या अभयारण्याची ओळख बनला होता.

 

कित्येकदा पर्यटक या वाघाची एक झलक पाहण्यासाठी उमरेडला भेट द्यायचे. मात्र अचानक हा वाघ  गायब झाल्याने वन्यप्रेमींच्या काळजीत भर पडली आहे. त्यातच जयचे बछडेही गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

संबंधित बातमीः

बेपत्ता तरण्याबांड जयची शिकार?


व्याघ्र दिनी आशियातील सर्वात मोठा वाघ जयच्या खाणाखुणा ?


'जय'चा तपास आता सीआयडीमार्फत, मुख्यमंत्र्यांचे आदेश


आशियातील सर्वात मोठा वाघ बेपत्ता, 'जय'च्या शोधासाठी 100 जणांची टीम


नागझिरा अभयारण्यात दोन महिन्यांपासून व्याघ्रदर्शन नाही