Rashmi Shukla : एकनाथ खडसे आणि संजय राऊत फोन टॅपिंग प्रकरणी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे. रश्मी शुक्ला यांच्याविरोधात खटला चालवण्यास राज्य सरकारनं नकार दिला आहे.  खटला चालवण्यास मागितलेली परवानगी गृह खात्याने नाकारलेली आहे. हा सर्व अहवाल न्यायालयात सादर केल्यानंतर ही केस बंद केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Continues below advertisement

एकनाथ खडसे आणि संजय राऊत फोनटॅपिंग प्रकरणानं राज्यात खळबळ उडाली होती. मागील काही दिवसांमध्ये रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट रश्मी शुक्ला यांनी घेतली होती. रश्मी शुक्ला यांच्याविरोधात खटला चालवण्यास मागितलेली परवानगी गृह विभागाने फेटाळली आहे. हा रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा मानला जातोय.   

मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर कुलाबा पोलिस स्थानकात फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यासंदर्भात आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी अथवा हा खटला चालवायचा की नाही, यासाठी गृह विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. मागील वेळी याबाबत परवानगी घेतली नव्हती. पण यावेळी हे प्रकरण परवानगीसाठी गृह विभागाकडे पाठवलं होतं. गृह विभागानं ही परवानगी नाकारली आहे. पोलीस हा सर्व रिपोर्ट आता न्यायालयात सादर करणार आहेत. त्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याविरोधातील आरोपपत्र अथवा खटला मागे घेण्यात येणार आहे. 

Continues below advertisement

पुण्यामध्येही रश्मी शुक्ला यांच्याविरोधात पुण्यातही अशाच प्रकाराचा गुन्हा दाखल झाला आहे. तो खटलाही पुढे चालेल की नाही , याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे. की या खटल्याप्रमाणेच तो खटलाही मागे घेण्यात येणार... हे येणाऱ्या काही दिवसातच समजेल. 

मुंबई पोलिसांकडे असे काही पुरावे होते, त्यानुसार रश्मी शुक्ला यांनी परवानगीशिवाय फोन टॅपिंग केले होते. तरिही खटला थांबवण्यात आल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होतेय. त्यामुळे येणाऱ्या काळात काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप काय?

- रश्मी शुक्ला यांच्यावर टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल. 

- फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात.

- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत आरोप केले होते. 

- राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना डॉ. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप.