मुंबई : राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात तातडीने कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (10 डिसेंबर) पोलीस महासंचालक कार्यालयात राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले आहेत. तसेच गेल्या शासनाच्या कालावधीत निर्भया फंड मधील निधी खर्च न झाल्याची बाब गंभीर आहे. हा निधी तात्काळ कशा पद्धतीने  वापरता येईल, याची कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.


महिलांवरील अत्याचाराबाबत कठोरात कठोर पावले उचलण्यात यावीत, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र पोलीस दलाच्या कामाची वाखाणणी नुकत्याच पार पडलेल्या देशातील पोलीस महासंचालकांच्या परिषदेत झाली. महिला अत्याचाराच्या प्रकरणात तात्काळ व जलद कारवाई करुन गुन्हेगारांना वचक बसेल असे काम करावे.

गेल्या शासनाच्या कालावधीत निर्भया फंड मधील निधी खर्च न झाल्याची बाब गंभीर आहे. हा निधी तात्काळ कशा पद्धतीने त्याचा त्वरित विनियोग करता येईल, याची कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी  ज्या आवश्यक असतील त्या सर्व सुविधा शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येतील. आपल्या सरकारला खाकी वर्दीच्या आतला माणूस मजबूत करायचा आहे, असे देखील मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.

सर्वसामान्य नागरिकांना पोलीसांविषयी आदर आणि त्याचबरोबर दरारा वाटेल अशा पद्धतीने काम करावे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, काही वेळा न्याय मागण्यासाठी सर्वसामान्य नागरिक अहिंसात्मक मार्गाने रस्त्यावर उतरतात. अशा वेळी नोंदविण्यात आलेले गंभीर गुन्हे वगळता साध्या स्वरुपाचे गुन्हे काढून घेण्यासाठी सकारात्मक पावले टाकावीत. अतिशय आवश्यक असेल तेव्हाच बळाचा वापर केला पाहिजे. पोलीसांमुळे नागरिकांचे सण- उत्सव आनंदात पार पडतात, असे म्हणत पोलीसांचे आभार मानले.

पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावेत. त्याला तात्काळ मान्यता देण्यात येईल. पोलीसांच्या घरांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, कर्तव्य कालावधीचे प्रश्न, कर्तव्य सहजतेने पार पाडता येतील यासाठीच्या सुधारणांसाठी प्रयत्नशील राहू. तसेच मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून त्याकडे जगाचे लक्ष असते. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच शहराच्या सुरक्षिततेसाठी सतत सतर्क रहावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.