Manoj Jarange Patil : गेल्या 14 महिन्यात मराठा समाजाची एकही मागणी मान्य केली नाही. एवढा द्वेष कशासाठी? आता 17 जाती घालताना गोरगरीब ओबीसींचा विचार का केला नाही का? अशी विचारणा मनोज जरांगे पाटील यांनी नारायणागडावर झालेल्या भव्य दसरा मेळाव्यातून केली. जरांगे पाटील यांनी शड्डू ठोकत आरक्षण घेतल्याशिवाय माघार हटणार नसल्याचा इशारा दसरा मेळाव्यातून दिला. मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यातून कोणतीही राजकीय घोषणा करण्याचे टाळले, पण आचारसंहितेपर्यंत राज्य सरकारला डेडलाईन दिली आहे. त्यानंतर महत्वाची घोषणा करणार असल्याचे ते म्हणाले. 



आता तुमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का?


मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ओबीसींमध्ये आधीच भरपूर असल्याने तुम्ही येऊ नका म्हणता. मग तुम्ही काल मोठ्या 17 जाती आरक्षणात घातल्या, आता तुमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का? अशी विचारणा त्यांनी केली. एकजण म्हणाला महाविकास आघाडीकडून लिहून घ्या, मगच आरक्षण देतो. आता ओबीसीमध्ये 17 जाती घालताना तुम्ही महाविकास आघाडीकडून लिहून घेतले का? अशी विचारणा करत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तुम्ही कितीही आंदोलन करा, कितीही कोटीच्या संख्येने या, आम्ही तुमच्या छातीवर बसून निर्णय घेणार, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या, असा इशारा त्यांनी दिला.


ते म्हणाले की, आचारसंहिता लागल्यानंतर मी तुम्हाला आपली मुख्य भूमिका सांगणार आहे. आचारसंहिता लागेपर्यंत धीर धरायचा आहे. सरकारला सांगतो की सुट्टी नाही. आचारसंहिता लागल्यानंतर तुम्ही सर्वांनी ऐकायचं. ते काय करतात हे सगळं पाहायचं. त्यांनी सगळं केल्याशिवाय आपण निर्णय घ्यायचा नाही. त्यांनी सगळं केल्यावर आपण निर्णय घ्यायचा. तुमच्या मनात जे आहे, ती ईच्छा पूर्ण करायची जबाबदारी माझी आहे. तुमची शान मी वाढवणारच आहे.


शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपल्याला लढावं लागणार


त्यांनी सांगितले की, क्षत्रिय मराठ्यांना लढायचं शिकवलं आहे. आल्यासमोर अन्याय करणारे असतील तर समोरच्यांना उखडून फेकावंच लागणार आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे. सगळ्या जातींसाठी लढणारा हा समाज आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या