अहमदनगर : मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान करायचा नाही, पण प्रश्न निर्माण झाले आहेत. तुम्ही 27 तारखेला मोर्चाला सामोरे गेला विरोध नाही, पण तुम्ही त्या मोर्चात मराठ्यांना आरक्षण देऊन  छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली पूर्ण केल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिवरायांची शपथ पूर्ण झाली असेल, तर मागासवर्गीय आयोग कशासाठी? असा थेट सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करत त्यांनाच आरोपांच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. 


तर परत उपोषण कशासाठी? छगन भुजबळांचा मनोज जरागेंना सवाल 


छगन भुजबळ म्हणाले की, नाभिक समाजाच्या कर्पुरी ठाकुरांना भारतरत्न दिला, यासाठी पीएम मोदींचे अभिनंदन करतो. मोदींनी ओबीसी ऋण मान्य केलं. ते पुढे म्हणाले की, 27 तारखेला गुलाल उधळला, तर परत उपोषण कशासाठी? अशी विचारणा भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली. अध्यादेश कळत नाही, अधिसूचनेचा मसूदा कळत नाही आणि म्हणतात आरक्षण मिळालं, अशी टीका त्यांनी केली. 



त्यांनी सांगितले की, राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्माद सुरु आहे. ओबीसी नेत्यांच्या घरासमोर शिवीगाळ सुरु आहे. 27 तारखेला गुलाल उधळला असेल, तर उपोषण कशासाठी? अशी विचारणा त्यांनी केली. जरांगे यांनी घोषणा केल्यानंतर  आमचे अधिकारी ताबडतोब निघतील आणि म्हणतील हे घ्या ते घ्या. मात्र, लढणाऱ्यांना काही मिळत नाही. यांना लगेच मिळतं. मराठा समाजाला विरोध नाही, वेगळं आरक्षण द्या अशी आमची मागणी आहे. आमच्या ताटात देऊ नको इतकंच म्हणणं आहे. ते मात्र, म्हणतात ओबीसीतून द्या. 


खोटी वंशावळ जोडण्याचे प्रकार सुरू


360 कोटी रुपये खोटे रेकॉर्ड तयार करण्यासाठी देण्यात आले का? अशी विचारणा भुजबळ यांनी केली. कुणबी जिथं म्हटलं आहे त्या अक्षरात बदल आहे, त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र देता येत नाही, असे मुख्याध्यापकचं पत्र आहे. कोणाशी लग्न केलं तरी तुम्ही आरक्षण पात्र ठरणार नाही असे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहे. खोटी वंशावळ जोडण्याचे प्रकार सुरू आहेत. 


तसेच झुंडशाहीने कोणी आरक्षण घेतल्यास त्याला विरोध करता येईल, असा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, तर ओबीसीला मिळणाऱ्या सर्व सुविधा द्या, मग ब्राह्मण, जैन आशा सर्वच समाजाला द्या अशी मागणी त्यांनी केली. ज्या दिवशी मागणी केली त्या दिवशी अधिसूचना निघते असे का? आम्हाला सांगावे लागते जे मराठा समाजाला देता ते ओबीसी समाजाला द्या.  एक समिती सथापन केली त्यात मराठा नेते आहेत त्यांना सर्व सवलती दिल्या जात आहेत, असे भुजबळ म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या