बैठकीनंतर तीन प्रतिनिधी राज्यपालांकडे जाणार आहे. आम्ही सरकार चालवू इच्छितो आम्हाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण द्यावे असे पत्र पाठवणार आहे. 1 डिसेंबरला शिवतीर्थावर शपथविधी घेतला जाईल, शिवतीर्थ ही जागा पुरेसी ठरेल का? असा सवाल शरद पवारांनी यावेळी उपस्थित केला. शरद पवार पुढे म्हणाले, हा सोहळा नाही तर गेल्या अनेक वर्षाचे हे व्यक्तीगत संबंध आहे. व्यक्तिगत सलोखा कधीच सोडला नाही सभेत अनेकवेळा समाचार घ्यायचो, अन् रात्री जेवण करायला एकत्र असायचो ते वेगळ्या प्रकारचे सूत्र होते.
राज्यात अनेक मोठे नेते झाले. बाळासाहेब असे नेते होते की, त्यांनी लहानतल्या लहान कार्यकर्त्यांना संधी दिली. असे सांगत असताना त्यांनी चंद्रकांत खैरे यांचे उदाहरण दिले. बाळासाहेबांनी अनेक लहानतल्या लहान कार्यकर्त्यांना विधानसभा आणि लोकसभेवर पाठवले. बाळासाहेबचं अशी किमया तेच करु शकतात, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले, राज्यातला शेवटच्या व्यक्तीला सुद्धा हे माझ सरकार आहे असे वाटले पाहिजे. तीच परंपरा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकडून पुढे सुरू राहील. सामान्य कुटुंबातील व्यक्तीलासुद्धा हे माझं सरकार आहे, असे वाटेल. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.