कोल्हापूर जिल्ह्यातील व्हन्नूर या गावात कोणत्याही बँकेची शाखा नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांना बँकेच्या व्यवहारासाठी तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे कागलमध्ये किंवा कोल्हापूरला यावं लागतं. त्यातच 8 नोव्हेंबरपासून नोटाबंदी झाल्यानंतर येथील ग्रामस्थांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र अशा अडचणीच्या काळात कागलमधील आयसीआयसीआय बँकेने राज्यातील पहिली 'ब्रँच ऑन व्हील्स' ही संकल्पना समोर आणली आणि व्हान्नूर गावातील लोकांचा पैश्यांचा प्रश्न सोडवला.
नोटाबंदीमुळे नागरिकांना पैश्यांसाठी धावाधाव करावी लागत असताना, बँकेने व्हन्नूर गावात बँकेची सर्व सुविधा देणारी ब्रँच उभी केल्याने लोकांनी एटीएम आणि बँकेतील इतर व्यवहार ही केले. बँक आपल्या दारात आल्याने त्यांना तात्पुरता का होईना थोडा दिलासा मिळाला. प्रत्येक दिवशी ही ब्रँच वेगवेगळ्या गावी जाऊन खेडोपाड्यातील नागरिकांना सुविधा देत आहे.
महाराष्ट्रात केवळ कोल्हापूर जिल्ह्यात अश्या दोन गाड्या तयार करुन ही सेवा सुरु करण्यात आली आहे. या सेवेमुळे नागरिकांची चांगली सोय झाली असल्याने त्यांनी बँकेच्या या विशेष सेवेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.