नागपूर: लोकसभेच्या भंडारा-गोंदियाच्या पोटनिवडणुकीत जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल उभे राहणार असतील, तरच आपण निवडणूक लढवू, अन्यथा दुसऱ्या कोणाला संधी देऊ, असं थेट आव्हान माजी खासदार नाना पटोले यांनी दिलं. ते एबीपी माझाशी बोलत होते.


नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करत, काही दिवसांपूर्वीच भाजपला रामराम ठोकला आहे.

मुख्यमंत्र्यांनी माझ्या वाटेला जाऊ नये, एवढीच त्यांना सूचना : नाना पटोले

थोड्याच दिवसात घरवापसी

काँग्रेसमध्ये तुमची घरवापसी झालीय का, असं विचारलं असता, पटोले म्हणाले मी मूळचा काँग्रेस विचारसणीचाच माणूस आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकट आलं, तेव्हा सर्वात आधी काँग्रेसने पुढाकार घेतला. त्यामुळे थोड्याच दिवसात घरवापसीचं चित्र तुम्हाला दिसेल.

फडणवीस, पटेल असतील तरच लढणार

काँग्रेस उमेदवार म्हणून पोटनिवडणूक लढणार का असं विचारलं असता, पटोले म्हणाले, “निवडणूक किंवा सत्ता हे माझं ध्येय नाही. पण सध्या देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला नेण्याचे वारे सुरु आहे. त्यामुळे माझ्या जिल्ह्यात उद्या फडणवीस लढणार असतील, तर मी त्यांच्याविरोधात लढेन. काहीवेळा अशीही चर्चा आहे की प्रफुल्ल पटेल भाजपमध्ये जाणार, जर पटेल लढले तर मी त्यांच्याविरोधात लढेन. पण त्यांनी जर दुसरा उमेदवार दिला, तर आम्हीही दुसरा उमेदवार देऊ आणि जिंकून येऊ, असं पटोले म्हणाले.

फडणवीस – पटोलेंच्या मैत्रीचं काय?

आमच्या मैत्रीत दुमत नाही, पण आमच्यात वैचारिक मतभेद झाले. शेतकरी कर्जमाफीमध्ये ऑनलाईनच्या नावे यांनी शेतकऱ्यांना लाईनमध्ये ठेवलं. हा प्रकार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थेला अपमानित करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीसांना केला. त्यामुळे आमचे वैचारिक मतभेद सुरु झाले. हे वैचारिक मतभेद असतील, पण मैत्री कायम असतील, असं पटोले म्हणाले.

VIDEO:


दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि नाना पटोले यांची नुकतीच एक बैठक झाली.

संबंधित बातम्या

भाजप खासदार नाना पटोले यांचा राजीनामा

मोदी हे बोगस ओबीसी, नाना पटोलेंचं वक्तव्य

नाना पटोले काँग्रेसमध्येच जाणार, जानेवारीत प्रवेशाची शक्यता

 निर्णय चुकला याची उपरती नाना पटोलेंना लवकरच होईल : मुख्यमंत्री