बारामती : माजी मंत्री आणि कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी अखेर आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. इंदापूरच्या जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करत त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. मात्र राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीवर केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. इंदापूरच्या त्यांच्या सभेनंतर मी त्यांना 50 ते 55 फोन केल्याचं अजित पवारांनी बारामतीमध्ये बोलताना म्हटलं आहे.


"हर्षवर्धन पाटील विनाकारण पवार कुटुंबावर खोटे आरोप करत आहेत. इंदापूरमध्ये त्यांनी आयोजित केलेल्या सभेनंतर मी 50 ते 55 फोन केले. माझ्या पीएसोबत त्यांच्या पुण्यातील घरीही जाऊन आलो. पण ते भेटले नाहीत", असे सांगत पाटील खोटे आरोप करत असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असा शब्द पाटील यांना दिला होता, असंही पवार म्हणाले.

'काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाची बोलणी वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर सुरु होती. इंदापूरला सध्या राष्ट्रवादीचे आमदार भरणे आहेत. त्या जागेसंबंधी आम्ही हर्षवर्धन पाटील यांना कोणताही शब्द दिलेला नव्हता. हर्षवर्धन पाटील व माझा राजकीय वाद आहे परंतु आम्ही शब्द पाळला नाही हा त्यांचा आरोप चुकीचा आहे', असा पलटवार पवार यांनी केला. इंदापूरच्या जागेबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाची बोलणी वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर होणार होती, त्यांनी आधीच त्यांचा निर्णय घेतला होता आणि आता आमच्या नावाने पावती फाडत आहेत, असे पवार म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की, आजचा ऐतिहासिक दिवस आहे. आमचा समाज अन्यायग्रस्त समाज आहे. अन्याय दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ताकद द्यावी. मी कुठलीही अट घालून भाजपात आलेलो नाही, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर कधीच टेन्शन पाहिलं नाही. आता त्यांच्या चेहऱ्यावर अजून हर्ष दिसेल कारण आता तुमच्याकडे हर्षवर्धन आलेला आहे.