कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चेसाठी नेमलेल्या मंत्रिगटाची बैठक रविवारी दुपारी 1 वाजता मुंबईत होणार आहे. या बैठकीसाठी आपण स्वत: परिवहन मंत्री दिवाकर रावतेंशी बोललो असल्याची माहिती महसूलमंत्री आणि उच्चाधिकार मंत्रिगटाचे प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसंच शेतकऱी आंदोलकांच्या 90 टक्के मागण्या आधीच सरकारनं मान्य केल्याचा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला.


उद्या रविवारी उच्चाधिकार मंत्रिगटाच्या बैठकीसाठी आपल्याला बोलावणं नसल्याचं दिवाकर रावतेंनी सांगितल्यानंतर त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील बोलत होते. "मी स्वत: दिवाकर रावतेंशी बैठकीबद्दल बोललो आहे" असं म्हणत दिवाकर रावतेंचा आरोप त्यांनी खोडून काढला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या मंत्रिगटाची आपल्याला कल्पनाच नसल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी याबाबत आपल्याला अंधार ठेवल्याचं रावते म्हणाले.

मंत्रिगटाबद्दल कल्पनाच नाही, रावतेंचा सरकारला घरचा आहेर


शेतकरी आंदोलकांच्या 90 टक्के मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत, उर्वरित 10 टक्के मागण्या रविवारच्या बैठकीत चर्चेतून सोडवल्या जातील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक चर्चा होत असताना पुन्हा रेल रोको सारखे आंदोलन का? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. शिवसेनेला आणखी सन्मान देण्याचा भाजपचा प्रयत्न राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं.