सांगली : सांगलीच्या वाळवामधील एका दाम्पत्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.


शहनाज अल्लाउद्दीन आत्तार (44) आणि अल्लाउद्दीन करिम आत्तार (48) अशी मृत पती-पत्नीचं नाव आहेत. आत्तार दाम्पत्य तासगाव तालुक्यातील वाळवा परिसरात वास्तव्यास होते. शहनाज आत्तार या अंगणवाडी सेविका होत्या, तर अल्लाउद्दीन आत्तार इस्लामपूर येथील पोस्ट खात्यात नोकरीला होते.


बुधवारी रात्री जेवणानंतर घरातच त्यांनी कीटकनाशक प्राशन केले आणि आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.


मात्र आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पत्नी-पतीने सोबत केलेल्या आत्महत्याच्या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.