मराठवाड्यातील शेकडो तरुण दहशतवादाच्या वाटेवर?
एबीपी माझा वेब टीम | 24 Jul 2016 06:47 AM (IST)
लातूर : मराठवाड्यातले तरुण मोठ्या प्रमाणात दहशतवादी होण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली आहे. लातूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खुल्या चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. दरम्यान मराठवाड्यातून सुमारे 100 तरुण बेपत्ता झाले आहेत का, त्यांचा दहशतवादाशी काही संबंध आहे का? याची माहिती घेण्याचं काम सुरु असल्याची माहितीही कुलकर्णी यांनी दिली. मराठवाड्यातून संशयित दहशतवाद्यांच्या अटकेचं सत्र सुरु झाल्यानं एटीएसप्रमुखांनी मराठवाड्यातच ठाण मांडली आहे. ज्या दहशतवाद्यांचा आता आम्ही अभ्यास करतोय, त्याच्या संगणकात 13 हजार छायाचित्रं आहेत. त्याचा अभ्यास सुरु आहे, गेल्या दोन महिन्यात महाराष्ट्रातल्या चार तरूणांना दहशतवादी विचारापासून यशस्वी परावृत्त केलं, अशी माहितीही त्यांनी दिली. जी 100 मुलं परदेशी निघाली होती, त्यांचं समुपदेशन करुन त्यांना परत आणलं आहे. त्यांच्यावर केसेस केलेल्या नसल्याचंही कुलकर्णींनी सांगितलं. त्या त्या धर्मातल्या लोकांनी या मुलांचं रॅडिक्लायजेशन थांबवायला हवं, असं मत त्यांनी व्यक्त केलं.