बीड : बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. परीक्षेच्या पहिल्य़ाच दिवशी इंग्रजीच्या पेपरला शिक्षण विभागाचा भोंगळा कारभार चव्हाट्यावर आला आहे. बीड तालुक्यातील रायमोहा येथे अतुल कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना चक्क जमिनीवर फरशी नसलेल्या जागेवर बसून परीक्षा द्यावी लागली.


बारावीसाठीच्या अतुल कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर इतर भौतिक सुविधा देखील नाही आहेत. या परीक्षाकेंद्रावर काही विद्यार्थ्यांना चक्क जिल्हा परिषद शाळेतील डेस्क बसण्यासाठी देण्यात आले होते. या प्रकारानंतर शिक्षणविभागाच्या कारभारावर सर्व स्तरातून टीका होतं आहे.

दरम्यान, राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतली जाणारी बारावीची परीक्षा आजपासून (18 फेब्रुवारी) सुरु होत आहे. राज्यातील एकूण 3036 परीक्षा केंद्रांवर 18 फेब्रुवारी ते 18 मार्च असा एक महिना बारावीची परीक्षा होणार आहे. राज्यभरातून 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यामध्ये विज्ञान शाखेचे 5 लाख 85 हजार 736 विद्यार्थी, कला शाखेचे 4 लाख 75 हजार 784 विद्यार्थी तर व्यावसायिक अभ्यासक्रमचे 57 हजार 373 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

यावर्षीच्या परीक्षेचं वैशिष्ट्य म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा आराखडा बदललेला आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मंडळाने हेल्पलाईन क्रमांकही जारी केले आहेत. शिवाय दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विभागीय मंडळामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

राज्यात कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी 273 भरारी पथकं तयार करण्यात आली आहेत. परीक्षा काळात गैरप्रकार टाळण्यासाठी ही भरारी पथकं काम करणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात समित्या नेमण्यात आल्या आहेत. तसेच परीक्षेला अर्धा तास आधी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणं गरजेचे आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात सकाळी साडे दहाच्या आत आणि दुपारच्या सत्रात दुपारी अडीचच्या आत विद्यार्थ्यांनी केंद्रावर उपस्थित राहणे गरजेचे आहे.

शिवाय परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांना मोबाईल नेण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयांच्या परीक्षांसाठी कॅल्क्युलेटर नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांना मोबाईलमधील किंवा अन्य कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स साधनांमधील कॅल्क्युलेटर वापरता येणार नाही. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी बारावी परीक्षेच्या काही महत्त्वाच्या पेपरमध्ये एक दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे.