मुंबई : देश लॉकडाऊन असताना महाबळेश्वरात दाखल झालेल्या वाधवान कुटुंबाला तिथे जाण्याची परवानगी कशी मिळाली, याची चौकशी करण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे संपूर्ण प्रकरणाची चौकशीची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

वाधवान बंधूंना आणि कुटुंबाला देशात संचारबंदी लागू असताना महाबळेश्वरला प्रवास करण्यासाठी विशेष पास किंवा परवानगी कशी मिळाली. महाबळेश्वरला जाताना त्यांच्य गाड्यांचा ताफा कुठेच कसा अडवला गेला नाही. शिवाय ते डीएचएफएल आणि येस बँक घोटाळ्यातील जामीनावर असलेले आरोपी आहेत. त्यामुळे यासर्व प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती किरीट सोमय्या यांनी राज्यपालांना पत्राद्वारे केली आहे.

येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्यातील आरोपी असलेले वाधावन बंधू यांना अटक करण्याऐवजी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांचं देशाला स्पष्टीकरण दिलं पाहिजे असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं. वाधवान कुटुंबियांकडे गृहमंत्रालयाचे पत्र असल्याने त्यांना प्रवासात कुणीच अडवले नसल्याची माहिती आहे. महाबळेश्वर येथील एका बंगल्यात वाधवान कुटुंब थांबलं होतं. त्यांना तिथून हलवलं असून पाचगणीतील रुग्णालयात भरती करण्यात आलें आहे. या सर्वांवर कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, वाधवान कुटुंबातील 23 लोकांना खंडाळा ते महाबळेश्वर यांना जाण्याची परवानगी कशी मिळाली याची चौकशी करणार, असल्याचं ट्विट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. 'त्या' २३ जणांमध्ये कुणाचा समावेश?
  1. कपिल वाधवान
  2. अरुणा वाधवान
  3. वनिता वाधवान
  4. टीना वाधवान
  5. धीरज वाधवान
  6. कार्तिक वाधवान
  7. पूजा वाधवान
  8. युविका वाधवान
  9. अहान वाधवान
  10. शत्रुघ्न घागा
  11. मनोज यादव
  12. विनीद शुक्ला
  13. अशोक वाफेळकर
  14. दिवाण सिंग
  15. अमोल मंडल
  16. लोहित फर्नांडिस
  17. जसप्रीत सिंह अरी
  18. जस्टीन ड्मेलो
  19. इंद्रकांत चौधरी
  20. प्रदीप कांबळे
  21. एलिझाबेथ अय्यापिल्लई
  22. रमेश शर्मा
  23. तारकर सरकार