अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील मार्कंडेश्वर डोंगरावर गेलेल्या पालखीवर मधमाशांनी हल्ला चढवला. या घटनेत पालखीतील 35 जणांसह 10 पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला चढवला. या घटनेत एकूण 45 जखमींपैकी दहा जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असून यातील एकजण गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.


मार्कंडेश्वर डोंगरावरील देवीच्या उत्सवासाठी येवले गावातील पालखी घेऊन भावी भक्त आले होते. दरम्यान यावेळी कुणीतरी त्या ठिकाणी असलेल्या आग्या मोहळाच्या पोळ्यावर दगड मारला. यामुळे काही क्षणातच मधमाशांनी गडावर आलेल्या 35 जणांवर हल्ला चढवला. मधमाशांच्या हल्यामुळे सर्व भक्तांची पळापळ सुरु झाली. शिवाय अनेकजण पळून जाताना पाय घसरुन पायऱ्यांवर जोरात पडल्याने त्यांनाही गंभीर दुखापत झाली.

दरम्यान अदमदनगरमधील एक 10 जणांचा समूह या गडावर फिरण्यासाठी आला होता. गडाच्या पायथ्यालाच स्थानीक नागरिकांनी त्यांना या घटनेबाबत कल्पना दिली होती.  मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यावेळी मधमाशांनी त्या दहा जणांवरही हल्ला चढवला. यात हे दहाजण देखील जखमी झाले आहेत. या दहांपैकी एक जण गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

या सर्वांना वाचवण्यासाठी कळवण, ओतुर ग्रामस्थ, वैनतेय ट्रेकिंग संस्था नाशिक, सप्तश्रृंगी देवस्थान मंडळ यांनी प्रयत्न केले.