हिंगोली : मंगल कार्यालयात वाजत गाजत, डीजेच्या तालावर वरात आली. वधू-वर बोहल्यावर चढले, आंतरपाठ धरला, वधू-वरांच्या आयुष्यातही महत्त्वाची लग्नघटिका सुरु झाली. दुसरं मंगलाष्टक सुरु झाले, त्याचवेळी वऱ्हाडी मंडळींमध्ये भांडण सुरु झालं. तुफान हाणामारी झाली, ती स्टेजपर्यंत पोहोचली.


नवरीला एकीकडे तर नवरदेवाला दुसऱ्या खोलीत ढकललं. धावपळ सुरु झाली. पण पोलिसांची योग्य वेळी एन्ट्री झाली मोठा अनर्थ टळला. पाच तासानंतर पोलिसांच्या साक्षीने वधू-वर विवाहबद्ध झाले.

चित्रपटाला लाजवेल असा हा आगळावेगळा विवाहसोहळा बाळापुरात घडला. आखाडा बाळापूर इथल्या मंगल कार्यालयात बाळापूरमधील वधू कविता बाळू धोतरे, तर नांदुरामधील वर ब्रम्हा हरिभाऊ शिंदे यांचा शुभविवाह होता. पिण्याचं पाणी देण्यावरुन वाद झाला. त्याचं पर्यवसान हाणामारीत झालं. या गोंधळात लग्नकार्य थांबले.

ही बातमी कळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. मारामारी थांबली पण आक्रोश थांबेना. सगळी वऱ्हाडी मंडळी पोलिस स्टेशनमध्ये जमले. पोलिसांनी समजूत घालत विवाह उरकण्यास सांगितलं. कारण या भांडणात नवरी-नवरदेवाचा दोषच नव्हता.

नवरीचे वडील बाळू धोत्रे यांची परिस्थितीची अत्यंत हलाखीची आहे. लग्न मोडलं तर मुलीचं काय होणार या भीतीने चिंता वाढली. मग पोलिसांनी नवरदेवाची समजूत घातली. अखेर नवरदेव तयार झाला. पण अर्धवट लग्नविधी मोडलेल्या ठिकाणी पुन्हा लग्न करणं अपशकुन मानलं जातं. त्यामुळे आम्ही तेथे विवाह करणार नाही, अशी अट त्याने घातली.

प्रभारी ठाणेदार सपोनि जी.एस.राहिरे यांनी पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांना ही हकीकत सांगितली व ठाणे आवारात विवाहविधी उरकण्याची परवानगी मागितली.

सहाय्यक पोलिस निरीक्षक जी एस राहिरे यांनी पोलिस अधीक्षक अरविंद चावरियां यांना ही हकीकत सांगितली आणि पोलिस स्टेशनमध्येच विवाहाच्या विधी उरकण्याची परवानगी मागितलं. चावरिया यांनी परवानगी देताच, पोलिस स्टेशनमध्ये विवाह सोहळा सुरु झाला. मंगलाष्टकं झाली, फुलांच्या अक्षता पडल्या. पोलिसांच्या आणि वऱ्हाडाच्या साक्षीने वधू-वर लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले.

पोलिस ठाण्यात लावलेल्या या लग्नामुळे सर्वत्र पोलिसांचं कौतुक केलं जात आहे. पोलिसांचं नाव येताच सर्व सामान्यांच्या मनात धडकी भरते. पोलिसांची प्रतिमा जनतेच्या तितकीशी चांगली नाही. मात्र हिंगोलीत पोलिसांचं वेगळे रुप पाहायला मिळालं. जवळपास मोडलेलं लग्न पोलिसांनी परत जुळवून आणलं.