हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्याची पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कळमनुरी तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी नागरिक श्रमदान करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. यंदाचा वॉटर कप जिंकण्याचा मानस कळमनुरीकरांनी केला आहे.


यामध्ये हिंगोलीचे काँग्रेस खासदार राजीव सातव हे सुद्धा मागे राहिलेले नाहीत.

खासदार राजीव सातव हे सलग 15 दिवस स्वत: श्रमदान करुन पानी फाऊंडेशनच्या चळवळीला बळ देणार आहेत.

राजीव सातव हे मागील एक महिन्यापासून श्रमदान करत असून, पुढील 15 दिवस शक्य होईल तिथे श्रमदान करणार आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुका सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेसाठी निवडण्यात आला. तालुक्यातील 110 गावापैकी 50-60 गावे जोमाने कामाला लागली.

पारडीमोड येथील काम उशिरा सुरु होऊनही आतापर्यंत समाधानकारक काम झाले आहे. पारडीमोड येथे रोज 75 पुरुष आणि 50 महिला श्रमदान करत आहेत.

आतापर्यंत 500 घनमीटर काम झालं असून, यामध्ये एक हजार कोटी लिटर पाणी साठवणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर इथे 1 हजार लिटर टँकर पाणी साठणार आहे. ज्यासाठी सुमारे 20 लाख रुपये मोजायला लागू शकले असते.

तिकडे चिंचोरडी गाव वॉटरकप जिंकण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी कामाला लागले आहे. गावातील नागरिक तर श्रमदान करत आहेतच, शिवाय मुंबई येथे शिक्षक असलेले रमेश कुरुडे यांनी आपला गाव सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी गावाची वाट धरुन श्रमदान केलं.