मुंबई : रिचा चढ्ढानं पायल घोषविरोधात दाखल केलेला मानहानीचा दावा मुंबई उच्च न्यायालयानं निकाली काढला आहे. दोन्ही बांजूंनी प्रकरण सामोपचारानं मिटवत असल्याचं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलं. पायल घोषनं बुधवारी हायकोर्टात आपला सशर्त माफीनामा सादर केला. ज्याला रिचा चढ्ढाच्यावतीनं सहमती दर्शवल्यानंतर हायकोर्टानं हे प्रकरण निकाली काढलं. न्यायमूर्ती अनिल मेनन यांच्यापुढे यावर सुनावणी पार पडली.


रिचाबद्दल केलेलं 'ते' विधान मागे घेत भविष्यात तिच्याबद्दल कोणतंही विधान करणार नाही अशी हमी पायलच्यावतीनं अॅड. नीतीन सातपुते यांनी दिली. तसेच पायल आणि रिचा भविष्यात या मुद्यावरून एकमेकांविरोधात कोणतीही फौजदारी तक्रार देणार नाहीत यावर दोघींचं एकमत झालेलं आहे. अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करताना पायलनं रिचा चढ्ढाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे रिचाचा अपमान होईल याची पायलला कल्पना नव्हती व मुळात तिचा तसा कोणताही हेतू नव्हता.


काय आहे प्रकरण


ऑगस्ट 2013 मध्ये अनुराग कश्यपनं आपल्याला त्याच्या घरी बोलावून लैंगिक गैरवर्तणुक आणि अश्लील वर्तन केल्याचा आरोप पायलने जाहीररीत्या केली. याबाबत रितसर तक्रार दाखल केल्यानंतर त्याविषयी मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू असतानाच पायलनं 'रिचा चढ्ढा, हुमा कुरेशी आणि माही गिल या आपल्यासोबत कंफर्टेबल असतात' असं अनुराग कश्यपनं आपल्याला सांगितलं होतं असं वादग्रस्त विधान पायलनं एका मुलाखतीत केलं होता. पायलने केलेले आरोप हे बिनबुडाचे आणि तथ्यहीन असून त्यामुळे माझी विनाकारण बदनामी होत असल्याचा दावा करत रिचा चढ्ढानं अॅड. सवीना बेदी आणि ज्येष्ठ वकील अॅड. वीरेंद्र तुळजापूरकर यांच्यामार्फत हायकोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.


हा व्हिडिओ दाखविणाऱ्या एबीएन तेलुगू या युट्युब वाहिनीला तसेच त्यावर प्रतिक्रिया देणा-या अभिनेता कमाल आर. खान यांनाही यात प्रतिवादी करण्यात आले आहे. या सर्व प्रतिवाद्यांना आक्षेपार्ह मजकूर पसरवण्यापासून तसेच तो प्रसारित करण्यापासून तातडीने मनाई करण्यात यावी, अशी विनंतीही रिचाने आपल्या याचिकेतून केली आहे. पायलच्या आरोपामुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का बसला असून प्रचंड अपमान, तिरस्कार, छळ, लोकांकडून होणारी छळवणूक आणि हसे याचा सामनाही करावा लागत आहे. याविधानामुळे आपल्याकडे येणाऱ्या संधींवरही नकारात्मक परिणाम होत आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून आपल्याला प्रचंड ताण आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच, सर्व प्रतिवाद्यांकडून 1 कोटी 10 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी रिचाने याचिकेतून केली आहे.