पंढरपूर : देशातील सध्याच्या परिस्थितीमुळे पंढरपूर विठ्ठल मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिराला हाय अलर्ट देण्यात आला आहे. मंदिर परिसरात येणाऱ्या चार चाकी वाहनांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अत्यंत गरजेच्यावेळी या वाहनांची कसून तपासणी करूनच मंदिर परिसरात सोडण्यात येत आहे.


मंदिरात प्रवेश करतानाही दारातून मेटल डिटेक्टर आणि स्कॅनिंग मशीनच्या तपासणीतूनच भाविकांना मंदिर प्रवेश करता येत आहे. मंदिराच्या सर्व प्रमुख द्वारांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मंदिरातही पोलीस व मंदिर सुरक्षा रक्षक सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवून आहेत. यासर्व सुरक्षा व्यवस्थांचा भाविकांना थोडा त्रास होत असला तरी सध्या परिस्थितीमुळे भाविकांकडूनही चांगले सहकार्य मिळत आहे.

हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन चौथ्या दिवशीच स्थगित, विरोधकांचीही साथ, न घाबरण्याचं आवाहन

देशभरात देण्यात आलेल्या हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं विधीमंडळाचं अधिवेशन काल चौथ्या दिवशीच गुंडाळले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली. अधिवेशन संस्थगित करण्यासाठी सर्व गटनेत्यांची काल बैठक सकाळी साडे दहा वाजता झाली. या बैठकीत विरोधी पक्षानेही या निर्णयाला समर्थन दिले. दुपारी एक वाजता अधिवेशन संस्थगित केल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. अधिवेशन काळात सर्व मंत्रिमंडळ आणि आमदार मुंबईत विधानभवन परिसरात असतात. यामुळं सुरक्षेवर अतिरिक्त ताण येतो. याच पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यासाठी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली. सर्वांशी चर्चा करुन अधिवेशन संपवण्याबाबत निर्णय घेतला गेला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले होते की, पुलवामातील हल्ल्यानंतर भारतीय वायू सेनेने दहशतवादी अड्डे नष्ट केले. सीमेवर तणावाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. अंतर्गत सुरक्षा अबाधित राखणं महत्वाचं आहे. मुंबई आर्थिक राजधानी असल्याने नेहमीपेक्षा जास्त निगराणी असली पाहिजे. पॅनिक होण्याचं काहीही कारण नाही पण जास्त काळजी घेणं गरजेचं आहे, असे ते म्हणाले. आपलं अधिवेशन अजून दोन दिवस चाललं असतं पण 6 हजारांचं पोलीस बळ याठिकाणी तैनात असते. पोलीस प्रशासनाला अधिकच्या फोर्सची गरज असल्याचं कालच्या बैठकीत निदर्शनास आलं.  सुरक्षा आढावा बैठकीनंतर सर्वपक्षीय गट नेत्यांनी विचार केला आणि एकमताने अधिवेशन आटोपतं घ्यावं याचा निर्णय घेतला. अतिरिक्त पोलीस बळ रिलीज करून इतर सुरक्षा व्यवस्थेसाठी उपलब्ध करून देण्याचा दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. कुठल्याही पॅनिकची स्थिती नाही हे पुन्हा स्पष्ट करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.

अधिवेशन चौथ्या दिवशीच स्थगित, विरोधकांचीही साथ, न घाबरण्याचं आवाहन