मुंबई : देशात 1 जुलैपासून जीएसटी कर प्रणाली लागू झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी जीएसटीच्या नावावर छापील किंमतीपेक्षा ग्राहकांकडून जास्त पैसे उकळले जात असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे अशा विक्रेत्यांची थेट तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे.


ग्राहकांनी छापील किंमतीपेक्षा जास्त पैसे घेणाऱ्याची तक्रार वैधमापन विभागाकडे करावी, असं आवाहन अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी केलं आहे.

पूर्वी असलेला उत्पादन शुल्क, विक्री कर यासह आकारण्यात येणाऱ्या इतर सर्व करांचं एकत्रीकरण जीएसटीमध्ये करण्यात आलं आहे. जीएसटीमुळे ग्राहकांचा फायदा होणार आहे. यामुळे महागाई वाढणार नसून उलट वस्तूंच्या किंमती कमी होणार आहेत. त्यासाठी उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी कराच्या परताव्यात मिळणारा लाभ हा ग्राहकांपर्यंत पोहचवला पाहिजे. नफेखोरी रोखण्यासाठी या कायद्यात तरतूद आहे, असं गिरीश बापट म्हणाले.

या कराची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी सर्वसामान्य ग्राहकांनीही अधिक सतर्कता दाखवली पाहिजे. काही दुकानदार आणि व्यापारी जीएसटीच्या नावाखाली ग्राहकांकडून छापील किंमतीपेक्षा अधिक किंमत आकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. असं करणं बेकायदेशीर असून ग्राहकांनी सजग रहावं आणि थेट तक्रार करावी, असं आवाहन गिरीश बापट यांनी केलं आहे.

तक्रार कुठे करणार?

ग्राहकांकडून छापील किंमतीपेक्षा अधिक दर घेऊन फसवणूक करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याची वैधमापन विभागाकडे तक्रार करता येईल.

  • Legal Metrology Maharashtra Consumer Grievances या फेसबुक पेजवर तक्रार करता येईल.

  • ९८६९६९१६६६ या व्हॉट्सअॅप क्रमांकावरही तक्रार करु शकता.

  • वैधमापन विभागाच्या dclmm_complaints@yahoo.com या ई मेल आयडीवर तक्रार करता येईल.

  • किंवा ०२२-२२६२२०२२ या हेल्पलाईन नंबरवर फोन करून तक्रार नोंदवता येईल.

  • अन्यथा संबंधित जिल्ह्यातील वैधमापन अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवण्याचं आवाहन गिरीष बापट आणि वैध मापन शास्त्र यंत्रणेचे नियंत्रक तथा विशेष पोलीस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी केलं आहे.