कोल्हापूर : गेल्या वर्षी 26 जानेवारीला झालेल्या अपघातानं चर्चेत आलेल्या कोल्हापुरातील शिवाजी पुलावरची अवजड वाहतूक तातडीनं बंद करा, असं स्ट्रक्चरल ऑटिडच्या अहवालात म्हटलं आहे. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरच्या पंचगंगा नदीवर हा महत्त्वाचा रहदारीचा पूल आहे.


गेल्या वर्षी 26 जानेवरीला शिवाजी पुलावर एक मिनी बस तब्बल 100 फुटावरुन पंचगंगेच्या पात्रात पडली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू, तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं.

मुंबईतील ध्रुव कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रा. लि.ने नवी मुंबईच्या ध्रुव कन्सल्टन्सीकडून या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेतले. या ऑडिटमध्ये कंपनीचे प्रकल्प संचालक जितेंद्र भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली दहा ते बारा अधिकारी, कर्मचार्‍यांच्या पथकाने 5 ते 10 फेब्रुवारीदरम्यान पुलाच्या विविध तपासण्या केल्या.

या तपासण्यानंतर तब्बल 22 पानी अहवाल सादर केला. या अहवालात पुलाच्या विविध भागाची छायाचित्रे समाविष्ट केली आहेत. एंडोस्कोपीच्या चाचणीत पुलाच्या कमानी आणि खांबातील दगडांतील भराव निघाल्याने, दगडं उघडी पडली आहेत, असं या अहवालात म्हटलं आहे.

त्यामुळे शिवाजी पुलाचे आयुष्यमान विचारात घेता या पुलावरील अवजड वाहतुकीचा धोका आहे. त्यामुळे या पुलावरुन अवजड वाहनांची वाहतूक तात्काळ थांबवावी, असा स्पष्ट अभिप्राय या अहवालातून दिला आहे.