संततधार पावसाने धरणांच्या पाणी पातळीत वाढ, बळीराजाही सुखावला
एबीपी माझा वेब टीम | 09 Jul 2016 12:06 PM (IST)
मुंबई: संपूर्ण महाराष्ट्रात संततधार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. विदर्भात गेल्या 24 तासात अक्षरश: पावसाने झोडपून काढले आहे. तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रासह नाशिकमध्येही संततधार पावसाने बळीराजा सुखावला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत गेल्या 24 तासाच चंद्रपूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. जवळपास जिल्ह्यातल्या संपूर्ण तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सावली तालुक्यात सर्वाधिक 221 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे, याचसोबत सिंधेवाही, बल्लारपूर, पोँभूर्णा, भद्रावती, वरोरा, मूल आणि चिमूर या तालुक्यातली 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. बहुतांश भागात वीज गायब झाली असून इंटरनेट, फोनसेवाही ठप्प झाल्याने नागरिकांच्या गैरसोयीत भर पडताना दिसते. नाशिकमध्ये बळीराजा सुखावला नाशिकच्या ग्रामीण भागातील हजेरी लावलेल्या पावसाने इथला बळीराजा चांगलाच सुखावलाय. आज सकाळपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी भातशेतीच्या पुढच्या कामाला सुरुवात केली आहे. या पावसामुळे शहरातल्या धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. त्यामुळे उशीरा हजेरी लावलेल्या पावसाने आता काही दिवस मुक्काम करावा अशी आशा इथला शेतकरी करतो आहे. धरणांच्या पाणी पातळीत वाढ कोल्हापूर शहराच्या धरणक्षेत्रातही आज पावसाने चांगली हजेरी लावली. धरणक्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने राधानगरी धरणाऱ्या पाणीसाठ्यात आश्वासक वाढ झाली आहे. हे धरण अर्ध भरण्यासाठी आता 69 टीएमसी पाठीसाठा आवश्यक आहे. तर याच भागातील घटप्रभा आणि कोदे ही धरण पूर्ण भरली आहेत.