रत्नागिरीः परतीच्या पावसाने कोकणातील रत्नागिरीमध्ये धुमाकूळ घातला आहे. खेड आणि चिपळूण तालुक्याला पावसाने जोरदार झोडपून काढलं आहे. नद्यांची पाणी पातळी वाढल्यामुळे धोक्याच्या इशारा देण्यात आला आहे.


नारंगी, चोरद, जगबुडी या नद्यांना मोठा पूर आला असून पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चोरद नदीला पूर आल्याने 32 गावांचा संपर्क तुटला आहे. तर बिजघर पुलावरुन एक युवक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दापोली ते खेड या मार्गावरील वाहतूकही पावसामुळे ठप्प झाली आहे. खेड परिसरात मुसळधार पावसाने शहराच्या बाजारपेठांमध्ये पुराचं पाणी घुसलं आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पुराची पातळी वाढल्यामुळे खबरदारी घेण्यात येत आहे.  प्रवाशांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.