रत्नागिरीः कोकणात वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रत्नागिरी शहर आणि ग्रामीण तसेच चिपळूण आणि खेड तालुक्यातही पावसाने हजेरी लावली आहे. वशिष्ठी आणि नारिंगी नद्यांच्या जलपातळीत वाढ झाल्यामुळे या दोन्ही शहरातील सखल भागात पाणी साचलं आहे.


 

 

पावसामुळे काही भागात पूल कोसळण्याच्या दुर्घटनाही घडल्या आहेत. पावसाचा वाढता जोर पाहता स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर रत्नागिरी शहरातही पावसाची संततधार सुरुच आहे. चांदेराई परिसरात पुराचं पाणी चढल्यामुळे काल ही बाजारपेठ रिकामी करावी लागली आहे.

 

 

पावसाची सध्याची परिस्थिती पाहता नद्यांतील पाण्याचा वेग कायम राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. कोकणात येत्या काळात मुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता वेधशाळेने वर्तवली होती.