Mumbai Rain Updates : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) पडत आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, मुंबईत (Mumbai) देखील जोरदार पाऊस सुरु आहे. हवामान विभागानं  (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील तीन ते चार तास मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.  


वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता


कमी दाबाचं क्षेत्र गुजरातकडून महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत असल्यानं जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात म्हणजे नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. वाहतूक मंदावणे, झाडांची पडझड होण्यासारख्या घटना घडण्याची शक्यता देखील आहे. दरम्यान, सकाळपासूनच मुंबईसह ठाणे परिसारत पावासाचा जोर वाढला आहे. रात्रभर पावसाची रिपरिप सुरु होती. त्यानंतर सकाळपासून पावसाचा जर वाढला आहे. आता पुढील तीन ते चार तास मुसळधार पावासाचा अंदाज वर्तवल्यानं मुंबईकरांना सतर्क राहावं लागणार आहे. सखल भागामध्ये पाणी साचल्यानं वाहतूक मंद गतीनं सुरु आहे. दरम्यान, मुंबईच्या लोकल रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र, वाहतूक संथ गतीनं सुरु आहे. 


राज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी 


मुंबईसह पुणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी  जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या तीन दिवसांत कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 16 आणि 17 सप्टेंबर म्हणजे आज आणि उद्या मुंबईसह उत्तर कोकणातील काही भाग आणि घाट परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता  हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच उत्तर प्रदेश आणि आजूबाजूच्या भागात देखील हवामान विभागानं पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील तीन ते चार दिवस मान्सून सक्रीय राहील, अशी माहिती हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र सिंधुदुर्गात शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: