सातारा : सातारा जिल्ह्यात महाड दुर्घटनेची पुनरावृत्ती होता-होता टळली आहे. कारण, कालपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे फलटण-बारामती रस्तावरचा 60 फूट लांब सोमंथळी पूल वाहून गेला. मात्र, वेळीच स्थानिकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानं त्यांनी या पुलावरची वाहतूक रोखून धरली. त्यामुळे या दुर्घटनेत कोणतिही जीवितहानी झाली नाही.


दरम्यान, हा पूल वाहून गेल्यानंतर राजाळे पुलावरुन जाण्याच्या प्रयत्न करणारे २ दुचाकीस्वार वाहून गेल्याची माहिती आहे. दुसरीकडे साताऱ्यातील दुष्काळी पट्ट्यात मुसळधार पाऊस बरसतो आहे. तासवडे ते बेलवडे परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे 15 घरांवरचं छप्पर उडाले आहेत. तर रस्त्यालगतच्या हॉटेलचंही नुकसान झालं आहे. तर काही झाडंही उन्मळून पडली आहेत.

मुंबईतही पावसाची जोरदार हजेरी

दुसरीकडे मुंबईसह राज्यात दूरवर पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत शहर आणि उपनगरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग, पवई, अंधेरी पूर्व भागात जोरदार पाऊस सुरु आहे. तर डोंबिवली, कल्याण शिळफाटा भागातही विजांचा गडगडाट सुरू आहे. तर, नवी मुंबईतल्या ऐरोली भागातही मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत.

दुसरीकडे वसई-विरार क्षेत्रातही पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. तर पश्चिम उपनगरांतही पावसाच्या हलक्या सरी बरसत आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत आहे.