मुंबई : मुंबई-उपनगरांसह कोकणात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती, मात्र शनिवारी सकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे.


मुंबई, ठाण्यासह कोकणपट्ट्यात आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान काल शनिवारी सकाळपासूनच मुंबईत पावसानं जोर धरला आहे. वसई-विरारमध्येही अखेर वरुणराजानं आपलं दर्शन दिलं आहे.

आजही मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतं आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. तिकडे रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग, पेण, उरण भागात काल रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या.

ठाण्यात झाड कोसळून गाड्यांचं नुकसान

ठाण्यात आलिशान गाड्यांवर झाड पडल्याने गाड्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. ही घटना इटर्निटी सोसायटीत घडली आहे. यात टोयाटो कंपनीच्या इनोव्हा, किर्लोस्कर, फियाट, ह्युंदाई ग्रँड सारख्या गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. फायरब्रिग्रेडचे अधिकारी झाड हटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

जोगेश्वरीतही भिंत कोसळली

मुंबईच्या जोगेश्वरी भागात काल शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास 2 सोसायटीमधील भिंत पडली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. केवळ 2 वर्षांपूर्वी बांधलेली ही भिंत होती. दुपारीच या 2 सोसायटीमधील लोकांना याचा अंदाज आल्याने त्यांनी भिंतीलगतचा भाग मोकळा करून ठेवला होता. तरीही या घटनेत 6 चारचाकी आणि 2 दुचाकींचं नुकसान झाले आहे.