मुंबई : वाढत्या उकाड्यामुळे मुंबई-पुणे-नाशकातील रहिवासी त्रस्त आहेत. त्यांचा हा त्रास आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासात मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता आहे. 'स्कायमेट'ने हा अंदाज वर्तवला आहे.


नाशिक-पुण्यात पारा चार ते सहा अंशांनी वाढण्याचा अंदाज आहे. तर मुंबई आणि परिसरात सहा ते आठ अंशांनी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या इतर भागांतही उष्णता वाढण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे उष्णतेच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे. डिहायड्रेशन पासून वाचण्यासाठी थेट सूर्यकिरणांपासून अंग झाकण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमान स्थिर आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान सरासरी किंवा त्यापेक्षा कमी आहे. मात्र येत्या काही दिवसांत पूर्वेकडून उष्ण वारे वाहणार असल्याने तापमानात वाढ होणार आहे.

एकीकडे राज्यात तापमान वाढण्याची शक्यता असताना महाबळेश्वरच्या पाऱ्यात अचानक घट झाली आहे. महाबळेश्वरचा पारा 10 अंशांपर्यंत खाली घसरला आहे.