गोंदिया : नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रात भीषण आग लागली आहे. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक झाली. तर वन्य प्राण्यांनाही या आगीचा फटका बसत आहे. तेंदूपत्ता व्यापाऱ्यांकडून ही आग लावण्यात आल्याचा संशय आहे.


तेंदूची लहान झाडं जळली की 15 दिवसात झाडाला मोठ्या प्रमाणात नवीन पालवी फुटते, असा व्यापाऱ्यांचा समज आहे. त्यामुळेच मजुरांच्या सहाय्याने अवैधरित्या जंगलात आग लावली जाते.

दुर्दैवाची बाब म्हणजे तेंदूपत्ता व्यापाऱ्यांनीच ही आग लावल्याचं सिद्ध झालं तरी विभागनिहाय 15 हजार रुपयांचा नाममात्र दंड आकारला जातो. तर  एखाद्या वेळेस त्याचा करार रद्द केला जातो.

या आगीमुळे दुर्मीळ वनसंपदेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन प्राणी मृत्युमुखी पडत आहेत. वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना व्याघ्र प्रकल्पही आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. त्यामुळे वन्यजीव प्रेमींकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा बफर क्षेत्र समजला जाणाऱ्या मुरदोली, दोडके, पुतळी, डूगीपार, शेंडा, कोयलारी, आलेबेदर या 15 कंपार्टमेंटमध्ये आग लागली असून याच परीक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वन्य जीवांचा वावर असतो. या आगीची झळ वन्य प्राण्यांना बसल्याची शक्यता नाकारता येत नाही. वन विभागाने योग्य कारवाई करावी, अशी मागणी वन्य जीव प्रेमी करत आहेत.