मुंबई: मार्चच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढल्याने सर्वत्र उकाडा जाणवत आहे. हे तापमान पुढील काही दिवसात आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.


पुढील आठवड्याभरात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात 2 ते 3 अंश सेल्सिअसने तापमान वाढणार आहे, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

गेल्या वर्षीपेक्षा यंदा सरासरी 0.5 ते 1 अंश सेल्सिअस तापमानात वाढ पाहायला मिळणार आहे. याशिवाय फेब्रुवारी महिन्यात ज्याप्रकारे अवकाळी पाऊस पडून गारपीट झाली होती, तशीच परिस्थिती पुढील 2 ते 3 दिवसात दिसण्याची शक्यता आहे. मात्र ही गारपीट कमी प्रमाणात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

याशिवाय पुढील काही दिवस मराठवाडा, विदर्भात सरासरी तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

उष्माघातापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्याल?

  • दुपारी 1 ते 3 उन्हात फिरु नका

  • मासे, मटण, तेलटक पदार्थ, शिळे अन्न खाणं टाळा

  • मद्यसेवन, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक घेणं टाळा

  • उन्हातून आल्यानंतर लगेच फ्रीजमधलं पाणी पिऊ नका

  • तहान नसेल तरीही पुरेसं पाणी प्या

  • सौम्य रंगाचे, सैल आणि खादीचे कपडे वापरा

  • बाहेर जाताना गॉगल, छत्री आणि टोपीचा वापर करा

  • प्रवासात पाणी नेहमी सोबत ठेवा

  • अशक्त वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या

  • ओआरएस, लस्सी, लिंबू पाणी आणि ताक अशी पेय घ्या

  • घर थंड राहिल याची काळजी घ्या

  • रात्री घराच्या खिडक्या नेहमी उघड्या ठेवा

  • जनावरांचीही काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी जनावरांना सावलीत ठेवा, पुरेसं पाणी द्या


संबंधित बातम्या

अकोला 'हॉट', देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद 

उन्हाळ्यात 'अशी' घ्या केसांची काळजी