मुंबई : राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग वगळता राज्यात सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशांच्या पार गेला आहे. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमान आज अकोल्यात नोंदवण्यात आलं. आज अकोल्याचं तापमान 47.2 अंश नोंदवण्यात आलं आहे. तर वर्ध्यातही तापमानाचा पारा 45.7 अंशावर पोहोचला आहे. वाशिम जिल्ह्यातील कांरंजामध्येही 47 अंशाचा पारा तापमानाने गाठला आहे.


अकोल्यात काल शनिवारी 46.7 अंश तर वाशिम आणि परभणीमध्ये 45 अंश तापमानाची नोंद करण्यात आली, किमान तापमान 25 अंश कोल्हापुरात नोंदवण्यात आलं.

दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मात्र असं असूनही कोल्हापूर आणि चंदगडला अवकाळी शनिवारी पावसानं झोडपून काढलं.

कोल्हापूरच्या आजरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली. अवकाळी पावसामुळं उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी या गारपीटीमुळे आणि पावसामुळे काजू, आंबे अशा फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे.